सातारा – मी राजकारणापेक्षा समाजकारणावर भर दिला आहे; परंतु राज्याचं राजकारण नक्की कोणत्या वळणावर चाललंय, ते मलाच कळायचं बंद झालंय, अशी उपरोधिक टीका भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत कोण काय करतंय, ते पाहणारच आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
उदयनराजे यांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधताना, राज्य सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, करोनाचे वास्तव नाकारणे शक्य नाही. लोकांना उपचारांचा दिलासा हवा आहे, आर्थिक अडचणींनी त्रस्त असणारी जनता कोणाचे ऐकायच्या मन:स्थितीत नाही. एखाद्या सामान्य तापाप्रमाणे करोना आहे. शासनातील तज्ज्ञ आरोग्य यंत्रणांनी याचा नक्कीच विचार केला असेल. आमचे सहकारी, मित्र रामदास आठवले हे मागे एकदा “गो करोना गो’, असे बोलले होते. ते प्रामाणिक भावनेने बोलले होते.
ते पुढे म्हणाले, देशात फॅमिली प्लॅनिंग केले असते तर आज कोरोना लसींचा साठा कमी पडला नसता, असे वक्तव्य भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. देशात लोकसंख्या पाहूनच कोरोना लसींचे वाटप झाले पाहिजे. लसीच्या वाटपावरून उगाच वाद निर्माण करण्यात अर्थ नाही, असे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
लॉकडाऊन शिथिल झालेच पाहिजे. लोकांना अन्न मिळाले नाही तर ते करणार काय? मी कधीही राजकारण केले नाही, पण जे चाललेय ते करमणुकीचा भाग झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत कोण काय भूमिका घेणार, तेच मी बघणार आहे, आ इशारा उदयनराजेंनी दिला. करोनाची साथ लगेच कमी होणार नाही. त्यासाठी लोकांनी व्यक्तिगत काळजी घ्यायला हवी.
प्रगतीच्या नावाखाली आपण निसर्गाच्या विरोधात चाललोय, हे कोणाच्या लक्षातच येत नाही, असेही ते म्हणाले. शरद पवार यांच्या भेटीबद्दल विचारले असता, उदयनराजे म्हणाले, मी पवारसाहेबांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलो होतो. त्यामध्ये कोणतेही राजकारण नव्हते. केंद्राकडून राज्याला जास्तीत जास्त लसींचा पुरवठा व्हावा, यावर आपली भूमिका काय, या प्रश्नावर ते म्हणाले, चीनच्या ग्रेट वॉलप्रमाणे आपणही एक मोठी भिंत बांधूया. आपल्याकडे जे चांगले आहे, ते आपण येथेच विकायला हवे. आपल्याला करोना झाल्याच्या भीतीनेच लोकांचे खच्चीकरण होत आहे.