अहमदाबाद – कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम टी-२० क्रिकेट सामन्यात ३६ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांची मालिका ३-२ अशा फरकाने जिंकली. याआधी कसोटी मालिका भारताने ३-१ च्या फरकाने जिंकली होती.
नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने २० षटकांत 2 बाद २२४ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तर फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाला २० षटकांत 188 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून शार्दूल ठाकूरने ३ तर भूवनेश्वर कुमारने २ विकेट घेतल्या.
विजयासाठी २२५ धावांचे लक्ष्य घेऊन फलंदाजीला आलेल्या इंग्लंडची सुरुवात अडखळत झाली. जेसन रॉय भोपळाही फोडू शकला नाही. मात्र जोस बटलर (52) आणि डेविड मलान (68) यांनी शानदार अर्धशतके झळकावून इंग्लंडच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. मात्र दोघे बाद झाल्यानंतर इंग्लंडचा डाव 188 धावांत संपुष्टात आला.
तत्पूर्वी सलामीला आलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ९४ धावांची सलामी दिली. रोहित शर्मा अर्धशतक करून बाद झाला. त्याने ३४ चेंडूत पाच षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ६४ धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने ३२ धावा केल्या. मात्र कोहलीने नाबाद राहत ८० धावा फटकावल्या. यात त्याने २ षटकार आणि ७ चौकार लगावले. तर हार्दिक पांड्याने नाबाद ३९ धावा केल्या.