मुंबई – राज्यात करोनाचा कहर सुरूच आहे. गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 27 हजार 126 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली असून 92 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 13 हजार 588 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजच्या रुग्णसंख्येनंतर आता अॅक्टिव्ह रूग्णांचा आकडा दोन लाखांच्या जवळ पोहचला आहे.
नागपूर, पुणे, मुंबई आणि ठाणे या शहरांत करोनाची सर्वाधिक रुग्णवाढ होत आहे. त्यामुळे या शहरांत आधीच करोनाबाबत कठोर नियम करण्यात आलेले आहेत. अशावेळी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यासाठी लाॅकडाऊनसारखे कठोर आणि टोकाचे पाऊल उचलू शकतात, असे बोलले जात आहे.
आज राज्यात 27,126 नवीन करोनाबाधित आढळले आहेत. करोना संसर्गाने महाराष्ट्रात शिरकाव केल्यापासून हा उच्चांकी आकडा आहे.
नवीन रूग्ण वाढत असल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घसरत आहे. आज हे प्रमाण 89.97 टक्के एवढे आहे. राज्यात आज 92 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत करोनामुळे 53300 जणांचा बळी गेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.18 टक्के एवढा आहे. आतापर्यंत एकूण 22 लाख 3 हजार 553 जणांनी करोनावर मात केली आहे.