मुंबई : राज्यात कोरोनाच्या संकटाने पुन्हा एकदा आपले हातपाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे आता अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या समोर नवे संकट उभे राहिले आहे. आज पहाटे मराठवाड्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या भागातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मराठवाड्यासह विदर्भ आणि राज्यातील अन्य भागातही 18 ते 21 मार्चदरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पावसासह गारपीट झाली आहे. तालुक्यातील हसनाबाद, तळेगाव, सुरंगळी या भागात पहाटे 5 च्या सुमारास वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट झाली आहे. त्यामुळे या भागातील पिकांच्या नुकसानीचा अंदाज व्यक्त केला जातोय. सुमारे अर्धा तास चाललेल्या पावसामळे जागोजागी गारांचा खच पडल्याचे दिसून आले आहे. वाशिम जिल्ह्यातही विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे या भागातील फळबागासह रब्बी पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ढगांच्या गडगडाटासह लातूर जिल्ह्यात अनेक भागात मध्यरात्री पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यामुळे या भागातील वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
सध्या राज्यातील विविध भागात शेतात ज्वारी, गहू , हरभरा, संत्रा, फळभाज्या अशी पीक आहेत. ज्वारी, गहू, हरभरा काढणीला आले आहेत. वादळ, पावसामुळ या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असून शेतकऱ्यांमध्ये या वातावरणामुळे काळजी निर्माण झाली आहे. मागील दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. हवामान खात्यानंही गारपीट, पावसाचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी गहू, हरभरासह इतर पिकांची कापणी करून घेण्याचे कृषी विभागाने आवाहन केले आहे.
नागपूर शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी रात्री अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रात्री दहाच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह सुरू झालेला पाऊस तब्बल एक तास हलक्या ते मध्यम स्वरूपात कोसळत राहिला. त्यामुळे उन्हाळ्याकडे वाटचाल करणाऱ्या पूर्व विदर्भात अचानक गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागाने आधीच 19 आणि 20 तारखेला नागपूरसह पूर्व विदर्भात पावसाचा इशारा दिला होता. दरम्यान या पावसामुळे शेतीचा नुकसान होण्याची शक्यता आहे.