अहमदाबाद – भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामना रविवारी होणार आहे. याआधी शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 8 विकेटने दणदणीत पराभव केला आहे. त्यामुळे दुसऱ्या सामना जिंकून विराटसेना मालिकेत पुनरागमन करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. दुसरीकडे कसोटी मालिकेप्रमाणेच इंग्लंडने टी-20 मध्येही चांगली सुरूवात केली. पण ही लय शेवटपर्यत कायम राखण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे.
पहिल्या टी-20 सामन्यात मानहानीकारक पराभव झाल्यामुळे दुसऱ्या सामन्यात विराटवर रोहितला खेळवण्यासाठी दबाव असेल. त्यामुळे रोहितला संघात स्थान देण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा मागच्या सहा कसोटीत लागोपाठ खेळला आहे. तसेच त्याआधी तो ऑस्ट्रेलियात 14 दिवस क्वारंटाईन होता, त्यामुळे त्याला पहिल्या सामन्यात विश्रांती देण्यात आली.
पहिल्या टी-20 मध्ये श्रेयस अय्यर वगळता कोणत्याच भारतीय फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. जोफ्रा आर्चर आणि मार्क वूडच्या नेतृत्वातल्या इंग्लंडच्या फास्ट बॉलिंगचा सामना भारताला करता आला नाही. हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंतला वेगवान गोलंदाजांना मिळणाऱ्या जास्तच्या बाऊन्सचा सामना करता आला नाही.
या मॅचमध्ये श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी केल्याने सूर्यकुमार यादवला पदार्पण करण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. या सामन्यानंतर विराटने श्रेयस अय्यरचेही कौतुक केले. बाऊन्स मिळणाऱ्या खेळपट्टीवर क्रीजचा वापर कसा करायचा हे श्रेयसने दाखवून दिले. इतर बॅट्समनना तसे करता आले नाही, असे विराट म्हणाला.
दुसऱ्या टी-20 मध्ये विराटकडे युझवेंद्र चहलऐवजी राहुल टेवटियाचा पर्यायही उपलब्ध आहे. टेवटिया स्पिन बॉलिंगसह आक्रमक बॅटिंगही करू शकतो. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात टी-20 वर्ल्ड कप होणार असल्याने त्याआधी संघ संतुलित करण्यासाठी ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे.
दोन बदलांची शक्यता
पहिल्या टी-20 सामन्यात रोहित शर्माच्या जागी शिखर धवनला संधी देत विराटने सर्वांनाच बुचकळ्यात टाकले होते. परंतु पहिल्या सामन्यात शिखर धवनला फक्त 4 धावा काढता आल्या. त्यामुळे दुसऱ्या टी-20 सामन्यात रोहित शर्माला धवनच्या जागी संधी दिली जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे प्रमुख वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुसऱ्या टी-20 सामन्यातून पुनरागमन करु शकेल. आयपीएलच्या तेराव्या हंगामात त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याचा समावेश नव्हता. मात्र इंग्लडविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याची निवड झाली आहे. परंतु पहिल्या टी-20 सामन्यात त्याला संधी दिली नाही. मात्र दुसऱ्या टी-20 सामन्यात भुवनेश्वरला संधी मिळू शकते.