राजगुरूनगर (पुणे) – खेड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुम्ही खेड तालुक्याला काय योगदान दिले ? विमानतळ, ‘सेझ’ला विरोध करून खेड तालुका मागे ठेवण्याचं काम केलं. आता खेड पंचायत समितीच्या इमारतीवरून दादागिरी करीत आहेत. तुमची दादागिरी कदापि खपवून घेणार नाही असा इशारा खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी पत्रकार परिषदेत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिला.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात सौख्या दिसून येते. त्यामुळे सरकार स्थिर आहे. मात्र पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत घमासाण सुरू असल्याचं चित्र आहे.
खेड पंचायत समितीच्या इमारतीवरून शिवाजीराव आढळराव पाटील आणि दिलीप मोहिते पाटील यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. आढळराव पाटील यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना आमदार मोहिते म्हणाले की, मी आढळराव पाटील यांचा नेहमीच आदर करीत आलो. आढळराव पाटील यांना निवडणुकीत अपयश आले. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. बिनबुडाचे आरोप करीत आहेत. आमच्यामुळे शिवसेनेला सत्ता आहे.
खेड तालुक्यात शिवसेनेत फूट पडली आहे. पंचायत समितीमध्ये शिवसेनेची सत्ता असताना उपसभापती भाजपचा करावा लागतो. यासारखे दुर्दैव काय असू शकते. मात्र असे असताना पंचायत समितीच्या इमारतींबाबत वाद घालत आहेत. काही नेत्यांना खेड पंचायत समितीच्या इमारतींबाबत आमची भूमिका योग्य आहे. असे वाटल्याने त्यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून आमची भूमिका योग्य असल्याचे सांगितले आहे. मात्र कुठेतरी राजकारण करून शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी आढळरावांचे हे प्रयत्न सुरु आहेत. त्यांना भाजप शिवाय आता पर्याय राहिला नाही. आघाडीचे सरकार आहे. पुढे आघाडी टिकेल त्यावेळी पक्ष तिकीट नाकारेल या भीतीपोटी ते पक्ष विरोधी भूमिका घेत असल्याचा आरोपही मोहिते यांनी केला.
जिल्हा परिषदेत कोणाच्या दबावाने मी काम करीत नाही. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यामुळे खेड पंचायत समितीचा ठराव बहुमताने घेतला आहे. जि.प. सदस्य होण्यापूर्वी 5 वर्षे सरपंच पद भूषवले आहे. पद घेऊन घरात बसणा-यांपैकी मी नाही. ज्यांनी मला संधी दिली त्या जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी माझे प्रयत्न असतात. जिल्हा परिषदेत अध्यक्षपदाचे काम करताना पक्षाच्या नेत्यांचे मार्गदर्शन घेते निर्णय घेण्याची क्षमता माझ्यात आहे. या कामात कोणाचा हस्तक्षेप नसतो.
– निर्मला पानसरे, अध्यक्षा, जिल्हा परिषद
“त्याचे’ श्रेय आढळरावांनी लाटू नये
खेड तालुक्यात आमदार असताना राज्यातील मॉडेल आयटीआय, मागासववर्गीय विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा, ट्रामा केअर, वाळदचा पायलट पूल, धरणांतर्गत पाभे शेंद्रूली बंधारासह तालुक्यात 42 पूल बांधले, कोर्टाची इमारत बांधली क्रीडा संकुल केले, शासकीय आश्रम शाळेच्या इमारती बांधल्या, आळंदी चाकण ग्रामीण रुग्णालय इमारती बांधल्या आढळराव पाटील तुम्ही खासदार होते तुम्ही काय केले. रेल्वे साठी केवळ पत्रकबाजी केली खासदार अमोल कोल्हे यांनी यासाठी पाठपुरावा केला त्यांच्या पाठपुराव्याला आता मोठे यश आले त्याचे आढळरावांनी श्रेय लाटू नये,असेही आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले.