– ह.भ.प. संतोष म. शास्त्री
तीर्थ व्रतनेम भावेवीण सिद्धी । वायांची उपीधि करिसी जना ।।
माऊली हरिपाठातील बाराव्या अभंगात म्हणतात, तीर्थव्रत व नेम यांची पूर्णता तेव्हाच होऊ शकले जेव्हा ती साधने करीत असता हरिविषयी पूर्णभाव असेल, तरच या साधनांच्या आचरणाने सिद्धी प्राप्त होईल. व्रत कोणते करावे यासंदर्भात संत तुकाराम महाराज म्हणतात,
व्रत करा एकादशी सोमवार । कथा पूजन हरिजागर । पुण्य ते असे गातां नाचतां फार । पुन्हा बोलिला संसार नाहीं नाहीं सत्वते ।।
म्हणजेच, एकादशी व सोमवार ही व्रते करा. त्या दिवशी सकाळी देवाचे पूजन व रात्री हरिकथा करून जागर करावा. असे वेदशास्त्र पुराणे सांगतात. आणखी एका ठिकाणी तुकोबाराय म्हणतात,
एकादशी व्रत सोमवार न करिती । कोण त्यांची गति होईल नेणों।।
दर पंधरा दिवसांनी येणारी एकादशी व आठवड्यातून येणारा सोमवार ही व्रते जे करीत नाहीत ते कोणत्या गतीला जातील हे मला कळत नाही.