कोल्हापूर – आजारपणाला कंटाळून पती-पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदाशिव बाळू भांदिगरे (वय-60, आकुर्डे, ता. भुदरगड) व सुरेखा सदाशिव भांदिगरे (वय-57) अशी त्यांची नावे आहेत. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसरा, सदाशिव भांदिगरे व सुरेखा भांदिगरे पती-पत्नी आजारी होते. त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते. त्यांनी शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान घरात कोणी नसल्याचे पाहून घराशेजारील जनावरांच्या गोठ्यात लोखंडी पाईपला दोरी व ओढणी बांधून गळफास घेतला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
त्यांचे भाऊ निवृत्ती भांदिगरे यांनी दोघांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. यानंतर त्यांचे मृतदेह गारगोटी येथील ग्रामीण रूग्णालायात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. त्यांच्यामागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
सदाशिव भांदिगरे हे इंजिनिअरिंग काॅलेजचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. ते मनमिळावू आणि समजूतदार व परखड स्वभावाचे होते. त्यांनी नुकतेच गुरूवारी काॅलेजला 25 हजार रूपये मदतीचा धनादेश दिला होता. त्यांच्या या निर्णयाने कुटुंबियांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.