खासगी डॉक्टरांना आदेश
पिंपरी – भारत देश 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त करायचा आहे. त्यासाठी भारत सरकारने क्षयरोगास गंभीर धोकादायक यादीमध्ये समाविष्ठ केले आहे. त्यासाठी शहरातील कोणत्याही खासगी रुग्णालयात रुग्णाचे क्षयरोगाचे निदान झाले तर शासनाला कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा अशा खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
त्यानुसार, भारत राजपत्र 19 मार्च 2018 नुसार सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिक, पॅथोलॉजीलॅब, रेडिओलॉजिस्ट व औषधविक्रेते यांना त्यांच्याकडे निदान झालेल्या क्षयरुग्णांची नोंद विहीत नमुन्यात शासनाकडे देणे बंधनकारक आहे. याबाबतची माहिती लपविणाऱ्यावर फौजदारी केली जाणार आहे. त्यामुळे नवीन निदान झालेल्या सर्व क्षयरुग्णांची माहिती शहर क्षयरोग अधिकारी व जीत संस्था यांना खालील ई मेल वर दर महिन्याच्या 25 तारखे पर्यंत कळविण्यात यावी.
मेल करण्यासाठी dtomhpim@rntcp.org , jeetpcmc@gmail.com या मेल आयडीचा वापर करावा. या सूचनांचे पालन न केल्यास निष्काळजीपणे जीवितास हानी पोहचविणाऱ्या रोगाचा फैलाव करणे या वेगवेगळ्या कलमातंर्गत दंड व कारावास अशी शिक्षा होऊ शकते.