अहमदाबाद – भारतीय संघाच्या फिरकीसमोर इंग्लंडने पुन्हा एकदा लोटांगण घातलं आहे. फिरकीपटू अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडला चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात 205 धावसंख्येवर रोखले.
इंग्लंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडकडून पहिल्या डावात बेन स्टोक्सने सर्वाधिक 55 धावा तर डॅनियल लॉरेन्सने 46 धावांची खेळी केली. तर ओली पोपने 29 आणि जॉनी बेयरस्टो 28 धावांची खेळी केली. भारताकडून गोलंदाजीत अक्षर पटेलने सर्वाधिक 4 , अश्विनने 3 विकेट्स, मोहम्मद सिराजने 2 आणि सुंदरने 1 विकेट घेतली.
चार सामन्याच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ 2-1 ने आघाडीवर आहे. भारतासाठी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने हा महत्वाचा सामना आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचण्यासाठी भारतीय संघाला चौथा सामना जिंकणे किंवा अनिर्णित राखणे गरजेचे आहे. अखेरच्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यास ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम फेरीत स्थान मिळवेल.
धावफलक –
इंग्लंड फलंदाजी पहिला डाव – सर्वबाद 205(75.5) – डॉम सिब्ले 02(08), जॅक क्रॉले 09(30), जॉनी बेयरस्टो 28(67) , जो रूट 05(09), बेन स्टोक्स 55(121), ओली पोप 29(87), डी लॉरेन्स 46(74), बेन फोक्स 01(12), डॉमनिक बेस 03(16), जॅक लीच 07(17), आणि जेम्स अँडरसन 10(15).