मुंबई – अर्थसंकल्पीय अधिवेशनास राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली आहे. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र-कर्नाटक वादावर भाष्य केले. राज्य सरकार मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी काम करत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले कि, माझे शासन कर्नाटक महाराष्ट्र वादाबाबत सर्वोच्च न्यायालयात ठाम भूमिका मांडत आहे. मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी काम करत आहे. तसेच राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजना, मदतही करण्यात येत आहे.
माझे कुटुंब माझी जबाबदारी हा देशातील अभिनव उपक्रम ठरला. धारावीसारख्या दाटीवाटीच्या वस्तीमध्ये राज्य शासनाने प्रभावी काम केले. करोनासंदर्भातील आरोग्य उपाययोजना वाढवण्याची गरज आहे. दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने आपल्याला परीने काळजी घेण्याची गरज आहे.
तसेच, औद्योगिक मंदी असतानाही राज्य सरकारने रोजगार मिळणे सुलभ व्हावे म्हणून महारोजगार आणि महाजॉब्ज पोर्टल सुरु केले. राज्य सरकारने आर्थिक अडचण असतानाही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असल्याचेही राज्यपालांनी सांगितले आहे.