मुंबई: आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. दरम्यान, या अधिवेशनाच्या पूर्वी महाविकास आघाडी सरकार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेता विरोधकांना अविश्वास ठराव आणण्याचे आव्हान देत आहेत. याच मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या वक्तव्यामागे त्यांचा आमदारांवरील अविश्वास कारणीभूत आहे का? अजित पवार नेमके कशाला घाबरत आहेत, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.
ते सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. विधानसभा अध्यक्षपद रिक्त असल्यास त्यासाठी तात्काळ निवडणूक होते हे संविधानाप्रमाणे बंधनकारक आहे. त्यामुळेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात पत्र पाठवून राज्य सरकारला विचारण केली होती.
मात्र, राज्य सरकारमधील नेते ही निवडणूक न घेता विरोधकांनी सभागृहात अविश्वास ठरावा आणावा, अशी आव्हानात्मक भाषा करत आहेत. अजित पवार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास का घाबरत आहेत? आपलेच आमदार आपल्याविरोधात मतदान करतील, असे त्यांना वाटते का? त्यांचा स्वत:च्या आमदांरांवर विश्वास नाही का? त्यामुळे अजित पवार यांच्या या वक्तव्याला अर्थ नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय आधिवेशनाच्या तोंडावर वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी पुजा चव्हाण प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची घोषणा केली असताना महाविकास आघाडी सरकार हे अस्थिर आहे यांच्यामधील नेते घाबरलेले आहेत, संधी मिळाली तर आमदार सोडून जातील या भीतीने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत नाही असे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.