मुंबई : महाराष्ट्रात करोना पुन्हा एकदा धुमाकूळ घालणार कि काय अशी भीती सध्या सर्वत्र निर्माण झाली आहे. कारण दिवसेंदिवस रुग्णसंख्येची आकडेवारी झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, या सर्वात आता आणखी एक चिंताजनक माहिती समोर येत आहे. देशात २४० नवीन करोना स्ट्रेन आढळून आले आहेत. यात महाराष्ट्रात आढळून आलेल्या करोनाच्या नवा स्ट्रेनच्या संसर्गाचा वेग प्रचंड असून, तो जास्त घातक ठरू शकतो, असा इशारा दिल्लीतील ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. या नवीन स्ट्रेनचा अॅण्टीबॉडीज तयार झालेल्या लोकांनाही संसर्ग होऊ शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. देशात करोनाचे २४० नवी स्ट्रेन आढळून आले असून, महाराष्ट्रात आढळून आलेला स्ट्रेन जास्त घातक ठरू शकतो, असं ते यावेळी म्हणाले. “भारतात हर्ड इम्युनिटी ही कल्पनाच ठरणार आहे. कारण देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के लोकांमध्ये अॅण्टीबॉडीजची गरज आहे.
महाराष्ट्रात आढळून आलेल्या नव्या करोना स्ट्रेनचा विचार केल्यास हे अवघड दिसत आहे. कारण या स्ट्रेनच्या संसर्गाचा वेग प्रचंड असून, तो जास्त घातक ठरू शकतो. इतकंच काय तर ज्या नागरिकांमध्ये अॅण्टीबॉडीज विकसित झालेल्या आहेत. त्यांनाही याचा संसर्ग होऊ शकतो,” इशारा डॉ. गुलेरिया यांनी दिला.
हर्ड इम्युनिटीबद्दल बोलताना गुलेरिया म्हणाले,”म्युटेशन्समध्ये (विषाणूचं बदलेलं रुप) किंवा नवीन स्ट्रेनमध्ये प्रतिकार शक्तीपासून बचावाची क्षमता तयार झाली आहे. त्यामुळे लसीमुळे वा करोनातून बऱ्या झालेल्या आणि अॅण्टीबॉडीज तयार झालेल्या माणसांनाही त्यापासून धोका होण्याची शक्यता आहे,” असा अंदाज गुलेरिया यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनीही करोनाच्या उद्रेकाविषयी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. देशभरात करोनाचे २४० नवीन स्ट्रेन आढळून आले आहेत. त्यामुळेच करोनाच्या संसर्गाचा वेग वाढला असून, महाराष्ट्रातही मागील आठवड्यांपासून करोना बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे, असे जोशी यांनी सांगितले.