पुणे – सियाचीन हा भारताचा महत्त्वाचा भाग आहे. आज अनेकांना सियाचीन हा देशाच्या नकाशावर नेमका कुठे आहे, हे माहित नाही. सियाचीनसाठी शासनाकडून करोडो रुपये खर्च केले जातात. सैनिकांवर एवढा खर्च का करायचा असे बरेच जण म्हणतात. परंतु, मोठ्या देशाच्या सीमा या ठिकाणी आहेत. चीन, पाकिस्तान, अफगाणिस्तान यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सियाचीन भारताच्या हातात असणे आवश्यक असल्याचे मत ब्रिगेडीयर प्रसाद जोशी (निवृत्त) यांनी व्यक्त केले.
सियाचीन भागात तैनात असताना जायबंदी झालेले मराठा लाइट इन्फट्रीचे हवालदार प्रशांत मुळे यांचा अखिल मंडई मंडळाच्या वतीने सन्मान केला.
निवृत्त हवालदार मेजर बजरंग निंबाळकर, हवालदार संदीप मोरे यांचा देखील सन्मान करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, खजिनदार संजय मते, विश्वास भोर उपस्थित होते.
सियाचीनमध्ये केवळ बर्फ असून, 1 किलोमीटर अंतर चालायला 5 तास लागतात. अतिशय कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितीत आपले जवान तिथे राहत असतात. यावरुन सियाचीनचे महत्त्व आपल्या लक्षात येते, असे जोशी म्हणाले. आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केले.