माले – रविवारी भारताने मालदिवबरोबर 5 कोटी डॉलरच्या “लाईन ऑफ क्रेडिट’ करारावर स्वाक्षऱ्या केल्या आणि मालदीवच्या सुरक्षेबाबत कटिबद्धतेचा पुनरुच्चारही केला. या कराराद्वारे मालदिवबरोबरच्या सागरी संबंधांना अधिक बळकटी दिली जाणार आहे.
द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि सहकार्याची नवीन क्षेत्रे शोधण्यासाठी मालदिवमधील वरिष्ठ नेत्यांशी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी चर्चा केली. संरक्षण क्षेत्रातील पतपुरवठ्याविषयीच्या करारावर भारतीय संरक्षण मंत्रालय, मालदिवचे अर्थ मंत्रालय आणि भारतीय आयात निर्यात बॅंकेच्यावतीने स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मालदीवचे संरक्षणमंत्री मारिया दीदी, अर्थमंत्री इब्राहिम अमीर, आर्थिक विकास मंत्री फय्याज इस्माईल आणि राष्ट्रीय नियोजन, गृहनिर्माण व पायाभूत सुविधा मंत्री मोहम्मद अस्लम यांच्याशी चर्चा केल्यानंतर या करारावर स्वाक्षरी झाली. जयशंकर यांनी संरक्षणमंत्री दीदी यांच्याशी सौहार्दपूर्ण चर्चा झाली आणि संरक्षण व सुरक्षा सहकार्याच्या विविध बाबींचा आढावा घेतला.
मालदीवच्या संरक्षण दलाच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढविण्यास, अन्य आर्थिक क्षेत्र आणि बेटांवर सागरी देखरेख ठेवण्याच्या कामात मालदीव सरकारला मदत करण्याकरिता भारत सरकारच्या सहकार्यासाठी एप्रिल 2013 मध्ये मालदीव सरकारने केलेल्या विनंतीनुसार झालेल्या या करारावर स्वाक्षरी झाली.