-माधव विद्वांस
मराठी रंगभूमीवरील गायक व अभिनेते भाऊराव कोल्हटकर यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म बडोदा येथे 9 मार्च 1863 रोजी झाला. त्यांचे शिक्षण बडोदा येथेच झाले. ते जरी फार शिकलेले नसले तरी लेखनिक होण्यापुरते शिक्षण असल्याने बडोद्याला पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात कारकून म्हणून नोकरीला लागले. याच काळात अण्णासाहेब किर्लोस्करांनी संगीत शाकुंतल नाटकाचा प्रयोग करून संगीत मराठी रंगभूमीचा 31 ऑक्टोबर 1880 रोजी शुभारंभ केला. त्यावेळी नाटकातील स्त्रीभूमिका पुरुषच करीत. तत्कालीन समाजव्यवस्थेमधे स्त्रियांनी नाटकात काम करणे लोकांच्या पचनी पडणे अवघड होते.
शाकुंतलच्या शुभारंभानंतर दोन वर्षांनी आपल्या नाटकातील स्त्रीभूमिका करण्यासाठी अण्णासाहेबांनी देखणे रूप आणि आवाज यामुळे भाऊरावांची निवड केली आणि 20 सप्टेंबर 1882 रोजी भाऊरावांचा वयाच्या अठराव्या वर्षी किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश झाला. भाऊरावांना अभिनयाचे धडे गोविंद बल्लाळ देवल यांनी दिले. भाऊराव शकुंतलेची भूमिका करू लागले.
संगीत नाटकाला येणारा प्रेक्षकवर्ग अतिशय चोखंदळ असल्यामुळे स्त्रीसुलभ सवयी त्यांनी आत्मसात केल्या होत्या, तसेच साडी नेसून शोभेसा साजशृंगार करणे व बायकी आवाज व भूमिकेशी प्रसंगानुरूप गाणे म्हणणे ही दुहेरी भूमिका त्यांनी समर्थपणे पार पडली. इ. स. 1882 ते 1889 पर्यंत भाऊरावांनी स्त्री भूमिका आणि त्यानंतर 1900 पर्यंत सुभद्रेचा अपवाद वगळता, मुखत्वे पुरुष भूमिका केल्या. वर्ष 1885 मध्ये अण्णासाहेब किर्लोस्करांच्या मृत्यूनंतर भाऊराव कोल्हटकर किर्लोस्कर नाटक मंडळीचे भागीदार झाले.
अप्रतिम अभिनय आणि गोड गळ्यामुळे भाऊराव कोल्हटकर यांच्या भूमिका लोकांना भावल्या. त्याकाळी किर्लोस्करांच्या शाकुंतल नाटकात “शकुंतला’ (वर्ष 1882), सौभद्र नाटकात “सुभद्रा’ (वर्ष 1882) व रामराज्यवियोग नाटकात “मंथरा’ (वर्ष 1884) या भाऊरावांच्या स्त्रीभूमिका अतिशय लोकप्रिय झाल्या. “सुभद्रे’ची भूमिका तर त्यांनी 1883 ते 1897 या चौदा वर्षांच्या काळात अखंडपणे केली. महाराष्ट्रातील घराघरांत ते लोकप्रिय झाले व त्यांच्या नावाचा उल्लेख आत्मीयतेने “भावड्या’ असा होऊ लागला.
वर्ष 1889 मध्ये गोविंद बल्लाळ यांच्या विक्रमोर्वशीय नाटकात “उर्वशी’ची भूमिका केल्यानंतर भाऊरावांनी नायकाच्या भूमिका करण्यास सुरुवात केली. वर्ष 1893 मध्ये देवल यांच्या “शापसंभ्रम’ नाटकातील “पुंडरीक’ व वर्ष 1895 “मृच्छकटिक’ नाटकातील “चारुदत्त’ या भूमिका पार पडल्या. त्यानंतर वर्ष 1896 मध्ये श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या पहिल्या “वीरतनय’ नाटकातील “शूरसेन’ आणि देवलांच्या “शारदा’ नाटकातील “कोदंड’ या भाऊरावांनी पुरुष अभिनेत्याच्या भूमिका करण्यास सुरुवात केली.
अण्णासाहेब किर्लोस्करांनी सुरू केलेल्या संगीत रंगभूमीची परंपरा त्यांनी आपल्या 18-19 वर्षांच्या कारकिर्दीत चांगल्या प्रकारे समृद्ध केली, त्यामुळे महाराष्ट्रातील संगीत रंगभूमीचा खरा प्रसार व उत्कर्ष भाऊरावांनीच केला असे म्हणावे लागेल. 17 मार्च 1900 रोजी पुण्याच्या आर्यभूषण नाटकगृहात भाऊरावांनी शारदा नाटकात केलेली “कोदंडा’ची भूमिका शेवटची ठरली. 13 फेब्रुवारी 1901 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले.