नवी दिल्ली – अमेरिकेच्या उपराष्ट्रध्यक्ष कमला हॅरीस यांची पुतणी मीना हॅरीस यांनी सहा फेब्रुवारी रोजी ट्विट करून नवदीप कौर यांना पाठिंबा व्यक्त केला. नवदीप कौर यांच्या सुटकेसाठी आधीही सोशल मिडियावर चर्चा सुरु होती. मीना हॅरीस यांच्या ट्विटनंतर नवदीप कौर आणखी प्रकाशझोतात आल्या.
सोनिपत – मजदूर अधिकार संगठन या संघटनेच्या नेतृत्वाखाली गेल्यावर्षीच्या डिसेंबरमध्ये सुमारे 300 कामगारांनी वेतनाच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहिम राबवली होती आणि संबंधित कारखान्याच्या व्यवस्थापनाकडे थकीत असलेल्या वेतनाची मागणी केली होती. हरियानीतील कुंडली येथील एका कारखान्यात हे सगळे काम करतात. महिनाअखेरीस कारखान्याचे खासगी सुरक्षा रक्षक आणि वेतनाची मागणी करणाऱ्या निदर्शकांमध्ये राष्ट्रीय राजधानी परिसरात (दिल्ली –एनसीआर) संघर्ष झाला. काही कामगारांवर गुन्हे नोंदवण्यात आले. त्यातील एक नाव म्हणजे नवदीप कौर.
23 वर्षाची नवदीप कौर ही तरुणी 12 जानेवारीपासून तुरुंगात आहे. खंडणी आणि खुनाचा प्रयत्न यासारखे गुन्हे तिच्यावर दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या कारवाईच्या विरोधात सोशल मिडियावरून सातत्याने आवाज उठवला जात होता. 6 फेब्रुवारी रोजी मीन हॅरीस यांनी ट्विट करून तिची अटक, पोलिस कोठडीत तिचा केला जाणारा छळ आणि अत्याचार याविरोधात आवाज उठवल्यानंतर तिच्यासाठीचा लढा आणखी तीव्र झाला आहे.
दुसरीकडे मीना हॅरीस यांनी केलेले आरोप पोलिसांनी फेटाळून लावले आहेत. उलट नवदीप आणि तिच्या सहकाऱ्यांनी 12 जानेवारी रोजी कुंडली येथे केलेल्या हल्ल्यात महिला कॉन्स्टेबलसह सात पोलिस जखमी झाल्याचा दावा केला आहे. त्याचवेळी नवदीपची बहिण राजवीर आणि वकील पंकज त्यागी यांनी नवदीपला अटक केल्यानंतर पोलिसांनी तिला कशी धक्काबुक्की केली आणि तिचा कसा छळ केला हे सांगितले आहे. राजवीरच्या म्हणण्यानुसार अटकेनंतर तिला पुरूष पोलिसांनी अमानुष मारहाण केली, अगदी तिच्या गुप्तांगाला इजा करण्यापर्यंत पोलिसांची मजल गेल्याचा दावा तिने केला आहे.
कारखान्याचे व्यवस्थापन आणि पोलिसांशी हिंसक संघर्ष झाल्यानंतर कारखान्यातील सुमारे 2000 कामगारांना घेऊन ती शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीच्या सिंघू सीमेवर पोचली. तिने शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिल्यानंतर तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले, असे राजवीर सांगते. नवदीपबरोबरच मजदूर अधिकार संघटनेचे प्रमुख नेते शिवकुमार यांनाही सोनिपत येथील देवरू येथून अटक करण्यात आली. त्यांची दृष्टी काहीशी अधू आहे. त्यांच्या अटकेबाबत आम्हांला पोलिसांनी काहीही सांगितले नाही, असे त्याचे वडील राजबीर यांचे म्हणणे आहे. गेल्या 25 दिवसांत पोलिसांनी आम्हांला त्याला भेटू दिले नाही किंवा त्याच्याशी बोलू दिलेले नाही, असे ते सांगतात.
करोनामुळे त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे एवढेच पोलिस आम्हांला सांगतात असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्याविरोधातील तीन फिर्यादीपैकी दोन फिर्यादी 12 जानेवारी रोजी दाखल करण्यात आल्या आहेत. खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या रवीकुमार आणि ललित खुराना यांनी त्या नोंदवल्या आहेत. पहिली फिर्याद 28 डिसेंबर रोजी नोंदवण्यात आली आहे. ती कुंडली पोलिस ठाण्यात नोंदवली असून ती फिर्याद टॉप्स
नाईट पेट्रोलिंग अँड डिटेक्टिव्ह सर्विस या खासगी कंपनीचा कर्मचारी समशेरसिंग याने दिली आहे. तीनही फिर्यादींमध्ये नवदीप, शिवकुमार आणि इतरांची नावे आहेत. त्यांच्यावर 379 ब हे कलम (खेचाखेची आणि झटापट) लावण्यात आले आहे. हरियानात हा अजामिनपात्र गुन्हा आहे. कुंडली पोलिस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल रवीकुमार यांच्या सांगण्यानुसार 28 डिसेंबर रोजी नवदीप कौर आणि तिच्या समर्थकांच्या विरोधात सुरक्षा रक्षकांशी गैरवर्तन केल्याचा आणि खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर आम्ही त्यांना चौकशीसाठी बोलवले नाही किंवा त्यांच्याविरोधात कुठलीही कारवाई केली नाही परंतु, त्यांनी 12 जानेवारी रोजी कारखान्याबाहेर पुन्हाधक्काबुक्की, गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केला असता पोलिसांनाच मारहाण करण्यात आली. याचे पुरेसे पुरावे पोलिसांकडे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. नवदीप कौर यांचे वकील पंकज त्यागी यांच्या सांगण्यानुसार 28 डिसेंबर आणि 12 जानेवारी या दोन्ही दिवशी घडलेल्या घटनांबाबत कामगारांनी देखील पोलिसांकडे तक्रार केली आहे, मात्र अद्याप ती नोंदवून घेण्यात आलेली नाही. 12 जानेवारी रोजी खासगी सुरक्षा रक्षकांनी हवेत गोळीबार केल्याने संघर्षाची परिस्थिती निर्माण
झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
नवदीप यांच्यावर लावण्यात आलेली भारतीय दंड संहितेची 307 (खुनाचा प्रयत्न), 379 ब आणि 384 (खंडणी) ही कलमे रद्द करावीत या मागणीसाठी आता पंजाब आणि हरियाना उच्च न्यायालयात जाण्याची तयारी नवदीपच्या कुटुंबियांनी केली आहे. तिच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, खंडणी अशी कलमे लावण्यास कुठलाही आधार नसल्याचा दावा तिच्या वकीलांनी केला आहे. केवळ तिला जामीन मिळू नये
यासाठी पोलिसांनी ही कलमे लावल्याचा मुद्दा त्यांनी मांडला आहे. कुंडली येथील उद्योगांच्या संघटनेनेही कामगारांचे वेतन थकल्याचा दावा फेटाळून लावला आहे. नवदीप कौरचा जन्म पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातील गांधार गावात झाला आहे. ती गेल्यावर्षी जुलैमध्ये दिल्लीत आली होती. दूरस्थ शिक्षणाद्वारे तिला बारावी पूर्ण करायची होती. मात्र लॉकडाऊन आणि आर्थिक परिस्थितीमुळे ती घरी परत आली आणि ऑक्टोबर 2020 पासून कुंडली येथील कारखान्यात काम करू लागली. वेतन अतिशय तुटपुंजे असल्याने दोनच महिन्यात तिने नोकरी सोडली आणि वेतनवाढीसाठीच्या निदर्शनांमध्ये सहभागी होऊ लागली. तिला संघर्षाचे बाळकडून तिच्या आईकडून मिळाले आहे.
तिची आई पंजाब खेत मजदूर युनियनची कार्यकर्ती होती. आई स्वर्णजित यांनी 2014 मध्ये एका बलात्कार पिडीतेला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. ही अल्पवयीन पिडीता खेत मजदूर युनियनशी संबंधित होती. आईच्या या सक्रीयतेमुळे कुटुंबियांसमोर अनेक समस्या उभ्या ठाकल्या. त्यांना तेलंगणात स्थलांतरित होण्याची वेळ आली. त्यामुळे नवदीपचे शिक्षण अर्धवट राहिले. तेलंगणात नवदीप, तिचा भाऊ, वडील हे सगळे एका पवन उर्जा कंपनीसाठी काम करत होते. अशा या बंडखोर वातावरणात वाढलेल्या नवदीपने वेतनाच्या विरोधात लढा दिल्याने आता तिच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे.