महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन
पुणे – करोना प्रादुर्भाव सुरू असताना आरोग्य विभागाने उत्तम पद्धतीने काम केले. विभागाचे मंत्री म्हणून राजेश टोपे यांनी अनेक ठिकाणी स्वत: जाऊन डॉक्टर, परिचारिका यांचे मनोबल वाढविले. रुग्णांना धीर दिला, त्यामुळे त्यांचे कौतुक होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेच्यावतीने आयोजित स्व. रावसाहेब शिंदे यांचा स्मृतिदिन समारंभ आणि पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी थोरात बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, पी. डी. पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, सचिन ईटकर उपस्थित होते.
यावेळी थोरात यांच्या हस्ते आरोग्यमंत्री राजेश टोपे, सह्याद्री फार्मर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, कवयित्री अनुराधा पाटील यांना स्व. रावसाहेब शिंदे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
राजेश टोपे म्हणाले की, जनतेची पहिली पायरी ही आरोग्य आहे. आरोग्य क्षेत्रात अनेक आव्हाने आहेत. त्यात खूप काही काम करण्यासारखे आहे. यामध्ये सर्वांना संतुष्ट करता नाही आले तरी सेवा मात्र करता येऊ शकते.
करोनामध्ये एनआयव्ही हॉस्पिटलसह सर्वांनी केलेल्या कामाचे डब्लूएचओने (जागतिक आरोग्य संघटनेने) कौतुक केले. लोकांना विश्वास देणे गरजेचे होते. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम केले पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन ईटकर यांनी केले.