राहुरी – करोना संसर्गाचा वेग कमी झाला असला, तरी संकट अद्यापही टळलेले नाही. तरीही अनेक ठिकाणी नागरिकांकडून नियमांची पायमल्ली होत असून विनामास्क फिरताना दिसत आहे. याच कारणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगरमधील एका सभेत भडकले.
मुख्यमंत्री सौरऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटनानिमित्त वांबोरी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार भडकले. “हे बघा, हे पठ्ठे इथे बिना मास्कचे फिरत आहेत. त्यांच्यापुढे आता डोके फोडून घ्यावे का? अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. करोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. हसण्यावारी घेऊ नका. काळजी घ्या, असा सल्ला त्यांनी दिला.
दरम्यान, नगर व पुणे जिल्ह्याने राष्ट्रवादीला मोठी ताकद दिली. नगरमधून पक्षाला सात आमदार मिळालेले आहेत. मात्र, ज्यांनी विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी पक्ष सोडला, त्यांना पराभव पत्करावा लागला, अशी टीकाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचे नाव न घेता केली.