नवी दिल्ली – शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर संचलनाला लागलेल्या हिंसक वळणात एकाचा मृत्यू झाला. तर काही शे जण जखमी झाले आहेत. मात्र या घटनेच्या दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांनी कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी हा कट रचल्याचा आरोप केला. सरकार, विरोधी पक्ष आणि पोलिसांनी शेतकऱ्यांच्या वेशात गुंड घुसवल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे.
गाझीपूरमध्ये संचलानाच्या निर्धारित मार्गावर बॅरिकेड्स लावल्याने गोंधळास सुरवात झाल्याचा आरोप भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केला. ते म्हणाले, या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने आले होते.
त्यांना विशेषत: दिल्ली मीरत द्रुतगती महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 24 आणि नऊ यांसह रस्त्यांची फारशी माहिती नसल्याने त्यांचा गोंधळ उडाला. जेथे ट्रॅक्टर संचलन काढण्यास पोलिसांनी परवानगी दिली होती, तेथे बॅरिकेड्स लावण्यात आले होते. त्या गोंधळातून काही शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर सराई काले खान भागात नेले. तेथून गोंधळास सुरवात झाली.
गेल्या काही दिवसांपेक्षा बुधवारी निदर्शक शेतकऱ्यांची संख्या बुधवारी लक्षणीयरित्या कमी होती. बॅरिकेड तोडणे आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा घटनाक्रम सांगण्यातच शेतकरी नेते व्यस्त होते. निदर्शनाच्या जागेवर मरण पावलेल्या आंदोलकांना श्रध्दांजली वाहण्यात येत होती.