नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त कारवाईत तीन दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर कुटुंबीयांने ते निर्दोष असल्याचा दावा केला आहे. बनावट चकमकीत यांची हत्या करुन ते दहशतवादी असल्याचा दावा केला जात असल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
पोलीस आणि लष्कराकडून ही संयुक्त कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ठार झालेले तिघेही दहशतवादी होते असं सांगितलं आहे. सोबतच रेकॉर्डमध्ये त्यांची दहशतवादी म्हणून नोंद नव्हती अशी माहिती दिली आहे.या चकमकीत ठार झालेल्यांमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असून दुसरा ११ वीत शिकत होता असा दावाही कुटुंबीयांनी केला आहे.
“ठार करण्यात आलेल्या तिनही दहशतवाद्यांचा आमच्या यादीत उल्लेख नसला तरी त्यातील दोघे कट्टर दहशतवादी होते,” अशी माहिती पोलिसांनी त्यांच्या निवेदनात दिली आहे. पोलिसांनी यावेळी “OGW” किंवा “over-ground worker” असा उल्लेख केला आहे. जम्मू काश्मीरमधील एखाद्या व्यक्तीचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा संशय असल्यास हा शब्द वापरला जातो.
पोलिसांनी चकमकीत ठार झालेला एकजण हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी रईस कचरु याचा नातेवाईक होता असे सांगितले आहे. २०१७ मध्ये रईस कचरु ठार झाला होता. बुधवारी चकमकीत ठार झालेल्यांची ओळख पटली असून एजाज गणी, अथर मुश्ताक आणि झुबीर अशी नावं आहेत. एजाज हा हेड कॉन्स्टेबलचा मुलगा असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.