मुंबई महाराष्ट्राचीच याला सर्व गुजराथी जनतेची मान्यता
मुंबई, ता. 27 – गुतरातमधील जनतेचे खरे मत गुजरात बाहेरील जनतेला समजलेले नाही. दोन वर्षांपूर्वीची परिस्थिती आज राहिलेली नाही. महाराष्ट्राचा मुंबईवरील हक्क सुरतचा अपवाद सोडून जवळजवळ सर्व गुजरातने मान्य केला आहे.
जनता परिषदेच्या बळाबद्दल अशाच गैरसमजुती व अफवा पसरविण्यात येत आहेत. परिषदेची ताकद व वजन कमी होत नसून ग्रामीण व अन्य भागात ती वाढत आहे. असे महागुजरात जनता परिषदेचे अध्यक्ष डाह्याभाई पटेल यांनी पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
सत्याग्रहासाठी सर्व ठिकाणांहून सत्याग्रही येत आहे असे सांगून पटेल म्हणाले, की तुरुंगातून सुटलेले ग्रामीण भागातील सत्याग्रही आज आपल्या भागात परिषदेचे कार्य करतात. मुंबई महाराष्ट्रात जावयाला मीही प्रथम विरोध केला होता परंतु महानगरपालिकेच्या निवडणुकीत जनतेने कौल दिल्यामुळे तो मानणे हे प्रत्येक लोकशाहीवाद्याचे कर्तव्य आहे म्हणून तो मीही मानला आहे. मुंबई कोठे जावयाची ते मुंबईकरांनी ठरवावयाचे आहे इतरांना त्याच्याशी काही कर्तव्य नाही.
अमेरिकेतील भारतासंबंधी सर्वोत्कृष्ट पुस्तक
पुणे – भारतासंबंधी अमेरिकेत यावर्षी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून अमेरिकन हिस्टोरिक असोसिएशनने, कोलंबिया विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या “सोर्सेस ऑफ इंडियन ट्रॅडिशन’ या पुस्तकाची निवड केली असून, त्याला वाटुमल पारितोषिक बहाल केले आहे.
पुण्याचे प्रा. आर. एन. दांडेकर आणि मद्रासचे प्रा. व्ही राघवन् यांनी या पुस्तकातील कित्येक प्रकरणे लिहून कोलंबिया विद्यापीठाला सहकार्य दिलेले आहे.
मृत प्राण्यांची शरीरे अंटार्टिका खंडात जशीच्या तशीच शाबूत
मॉस्को – अंटार्टिक प्रदेशातील मेलेल्या प्राण्यांची शरीरे जशीच्या तशीच सुरक्षित राहत असल्याचे सोव्हिएत भूगोलशास्त्र येवगेनी कोरोत्केविच यांच्या पाहण्यात आली आहेत. सील व पेंग्विन यांची ही शवे या खंडाच्या पूर्व किनाऱ्यावरील बर्फरहित प्रदेशात आढळून आली.
विशेषतः इन्ग्रिड ख्रिस्तेन्सेन किनाऱ्यावर “मृत्यूंचे खोरे’ नावाच्या प्रदेशात अत्यंत खारट सरोवराच्या काठी कित्येक मैलाच्या मैल सुरक्षित अवस्थेतील शवे पसरलेली आढळून आली.