-ह.भ.प. रोहिदास म. उभे
नामजपयज्ञ तो परम । बाधूं न शके स्नानादि कर्म । नामें पावन धर्माधर्म । नाम परब्रम्ह वेदार्थें ।।
संत ज्ञानेश्वर महाराजांनी श्री ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायात (विभुतीयोग) नामाची श्रेष्ठता सांगितली आहे.
माऊली म्हणतात, नामजपयज्ञ हा सर्व यज्ञांमध्ये श्रेष्ठ आहे. हा नामजपयज्ञ करण्यासाठी कोणतीही बंधनं पाळण्याची आवश्यकता नाही. स्थळ, काळ, वेळ याचा विचार न करता कुठेही तुम्ही हा यज्ञ करू शकता.
नामजपयज्ञ केल्याने धर्म आणि अधर्म दोघेही पवित्र होतात. तसेच भगवंताचे नाम हेच परब्रह्म आहे, असे वेदानेही सांगितले आहे.
संत तुकाराम महाराज देखील एका अभंगात म्हणतात, राम म्हणता वाट चाली । यज्ञ पाऊला पाऊली । त्याचबरोबर शांतीब्रह्म एकनाथ महाराजही नामाची महती सांगताना म्हणतात की,
कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम । एक हरिनाम जपता घडे । म्हणून मानवाने सतत भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे.