पुणे – पवित्र पोर्टलद्वारे 4,500 शिक्षकांच्या भरतीचा टप्पा पूर्ण करण्यावरील स्थगिती राज्य शासनाने उठविली आहे. यामुळे तब्बल सात महिन्यानंतर रखडलेल्या शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला.याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या कक्ष अधिकारी कविता तोंडे यांनी शिक्षण आयुक्तांना आदेशही जारी केले आहेत. यामुळे आता भरती प्रक्रिया सुरु करण्यासाठी शिक्षण विभागातील हालचालींना वेग येऊ लागला आहे.
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून गेल्या वर्षापासून शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल ही प्रणाली विकसित करण्यात आली. 12 हजार शिक्षकांच्या भरतीचा टप्पा राबविण्याची घोषणा शासनाने केली होती, त्यातील मुलाखती शिवायची 6 हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. माजी सैनिकांच्या काही जागा कन्व्हर्ट करण्यात येणार आहे. तसेच इतरही काही कारणांमुळे 1 हजार 500 जागा रिक्त आहेत. खासगी शैक्षणिक संस्थांमधील मुलाखतीसह 3 हजार पदे भरण्यात येणार आहेत.
शिक्षक भरतीत न्यायालयीन प्रकरणांसह इतर अनेक अडचणी निर्माण होत असल्या तरी त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. एसईबीसी, ब्रीज कोर्स याबाबतच्या प्रकरणांचाही त्यात समावेश आहे. शासनाच्या शिक्षक भरतीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना आल्यानंतर भरतीची प्रक्रिया तात्काळ वेगाने सुरु करण्यात येणार आहे. यासाठी सर्व यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आलेली आहे. पुढच्या महिन्यात इयत्ता नववी ते बारावीच्या शिक्षकांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर खासगी शाळांमधील मुलाखतीसह शिक्षक भरतीही सुरु होणार आहे.
– विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त