नवी दिल्ली – केंद्र सरकारने कृषी विषयक तीन नवीन कायदे रद्द केले, तरच दिल्लीत सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन थांबेल असा निर्वाणीचा इशारा आखिल भारतीय किसान सभेने दिला आहे. शेतकरी आणि सरकार यांच्यातील पाचव्या फेरीची चर्चा आज सुरू होत आहे, त्याच्या आधी या संघटनेने ही भूमिका स्पष्ट केली आहे.
या आंदोलनाने आम्हाला नेमके काय हवे आहे याचा आमच्या मनात किचींतही गोंधळ नाही. आम्हाला हे कायदे रद्द झालेलेच हवे आहे त्यापेक्षा आम्ही कोणतीही मागणी किंवा तडजोड मान्य करणार नाही असे या संघटनेचे पदाधिकारी कृष्ण प्रसाद यांनी आज येथे सांगितले.
ते म्हणाले की आमच्या आंदोलनाचा पाठिंबा वाढत चालला असून आता ट्रान्स्पोर्ट संघटना, किरकोळ विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या संघटना, तसेच अन्यही संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. आमची ही चळवळ केवळ शेतकऱ्यांच्या हिताची नाही तर अन्यही घटकांच्या हिताची आहे असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले.