नगर -महापालिका व कोतवाली पोलिसांचा कारभारा चव्हाट्यावर आला असून, याबाबत आ. संग्राम जगताप यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला. महापालिकेच्या कारभारावरून संतप्त झालेले आ. जगताप यांनी तेथेच उपस्थित असलेले आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना अक्षरशः झापले. याबाबत लक्ष घालण्याचे आश्वासन पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिले.
यापूर्वीही आ. जगताप यांनी महापालिकेच्या कारभाराबाबत वारंवार महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे पत्र दिलेले आहेत. दिलेल्या पत्रांवर कारवाई करणे दूरच, अनेकदा आयुक्तांकडून त्याचे उत्तरही मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. यावर आ. जगताप यांनी आयुक्तांशीही वारंवार चर्चा केलेली आहे. मात्र त्यात फरक पडत नसल्याने अखेर यावेळी आ. जगताप यांनी थेट पालकमंत्र्यांकडेच तक्रारी केल्या. शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मोकाट जनावरे पकडण्याबाबत वारंवार सांगूनही महापालिका यंत्रणा उभी करत नाही. तक्रार करताना स्वतः आयुक्त तेथे उपस्थित होते. “त्यांना विचारा एक तरी जनावर महापालिकेने धरले का,’ असेही आ. जगताप म्हणाले.
करोनाच्या दुसऱ्या लाटेची सर्वत्र भीती आहे. अशा पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार चांगला नसल्याकडेही आ. जगताप यांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. आरोग्य विभागाचे अनेक प्रश्न असूनही त्याकडे लक्ष दिले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. केडगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. परिसरातील नागरिक यामुळे भयभीत आहेत. सातत्याने चोऱ्या होत असूनही पोलिसांकडून ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत.
याची दखल घेत आ. संग्राम जगताप यांनी भर पत्रकार परिषदेतच आपल्या तक्रारी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. केडगाव परिसरातील चोऱ्यांचे प्रकरण कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच एखादा गुन्हा दाखल झाला, तरी चोरीस गेलेला ऐवजी कमी दाखविण्यासाठी संबंधितांवर दबाव टाकला जात असल्याचेही आ. जगताप यांनी सांगितले. तसेच शहरातील वाहतूक प्रश्नावरही आ. जगताप यांनी बोट ठेवले. या तक्रारी ऐकल्यानंतर या संदर्भात मी स्वतः लक्ष घालतो, असे आश्वासन पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिले.