नगर -बिबट्यांच्या वाढत्या प्रादुर्भावाचा नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठाच धसका घेतला आहे. परिणामी रात्रीच्यावेळी शेतकरी शेतात जाणे टाळत आहेत. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करू. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी त्यासंदर्भात चर्चा करण्याची ग्वाही ग्रामविकासमंत्री तथा नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली.
बिबट्यांना पकडण्यासाठी अधिक पिंजरे उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही ते म्हणाले. पालकमंत्री मुश्रीफ यांनी येथील विविध विषयांवर आज आढावा बैठक घेतली. त्यावेळी करोना प्रादुर्भाव व संभाव्य दुसरी लाट, अतिवृष्टी व अवकाळी पावसाने झालेले नुकसान व मदतवाटप, जिल्ह्यात बिबट्याचा मानवी वस्तीत वाढलेला वावर व त्यावरील उपाययोजना, कृषी योजना आदींचा त्यांनी तपशीलवार आढावा घेतला.
जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, आयुक्त श्रीकांत मायकलवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्यचिकित्सक सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, महापालिका आरोग्याधिकारी अनिल बोरगे यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. अवकाळी पाऊस व अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीसंदर्भात राज्य शासनाने 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. जिल्ह्यासाठी आतापर्यंत 73 कोटी 50 लाख रुपयांच्या मदतीचे वितरण करण्यात आले आहे.
उर्वरित निधी लवकरच प्राप्त होवून वितरित होईल, अशी माहिती पालकमंत्री मुश्रीफ यांनी यावेळी दिली. करोना काळात सेवा बजावताना मृत्युमुखी पडलेल्या जिल्हा परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना त्यांनी 50 लाख रुपयांचा धनादेश व कृतज्ञतापत्र यावेळी प्रदान करण्यात आले. पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, “”जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला आहे. पाथर्डी तालुक्यात त्याने तीन जणांचे बळी घेतले. वनविभागाने बिबट्यांना पकडण्यासाठी पावले उचलली आहेत. जिल्ह्यासाठी अधिक पिंजरे मिळावेत, यासाठी राज्य स्तरावर निश्चितपणे प्रयत्न करू. जनतेनेही घराबाहेर पडताना, शेतात जाताना काळजी घ्यावी.”