मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अभिवादन केले. यावेळी राऊत यांनी भाजपला हिंदुत्वावरून सणसणीत टोला लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले कि, आमचे हिंदुत्व प्रमाणित करण्यासाठी कोणत्याही पक्षाची गरज नाही. आम्ही प्रखर हिंदुत्ववादी होतो, आहे आणि कायम राहणार. त्यामुळे तुमच्याकडून कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही. हिंदुत्वाच्या मुद्यावर आम्हाला राजकारण करायचे नाही. देशाला जिथे कुठे शिवसेनेची गरज पडेल तिथे शिवसेना हिंदुत्वाची तलवार घेऊन हजर राहिल, असेही त्यांनी म्हंटले आहे.
बाळासाहेब ठाकरे हे आमच्यात नाही ही वेदना कायम आहे. बाळासाहेब सतत विचारांने आमच्यासोबत कायम आहे. आम्ही फक्त त्यांना देहाने निरोप दिला. पण, त्यांचे विचार, हिंदुत्व, मराठी बाणा हे सर्व कायम स्वरुपी आमच्यासोबत आहे. हाच वारसा घेऊन आम्ही पुढे वाटचाल करत आहोत.
तसेच, ५५ वर्षांपूर्वी बाळासाहेबांनी जो बेरोजगारी, भूमीपुत्रांचा मुद्दा मांडला त्यावरच आजही देशाचे राजकारण केंद्रीत आहे. बिहार निवडणुकीत पाहिले असेल तर या दोन मुद्द्यांवर विषय केंद्रीत राहिला, असे संजय राऊत यांनी सांगितले.