नगर (प्रतिनिधी) – बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि कार्यपद्धती उद्धव ठाकरे यांनी गुंडाळून ठेवली आहे. त्यांच्यासमोर अल्लाहू अकबरचे नारे दिले जातात. टिपू सुलतान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात. त्यांच्यासमोर त्यांना जनाब उद्धव ठाकरे म्हटले जाते. आता भाषणाची सुरुवात सुद्धा त्यांनी बदलली आहे. धर्म निरपेक्षतेच्या रांगेत ते जाऊन बसले, त्यामुळे त्यांच्याकडून जास्त अपेक्षा करणे उचित नाही, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नगर येथे विखे यांच्या आशिर्वाद बंगल्यावर केला.
नगरमधील संत निरंकारी मैदानावर आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस आले असताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या आशीर्वाद निवासस्थानी त्यांनी भेट दिली. त्यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. भाजपमध्ये पक्षांतर्गत नाराजी असल्याचा त्यांनी इन्कार केला.
युतीत काम करताना सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाही. युतीत काही जागा घ्यावा लागतात व काही द्यावा लागतात. यामुळे काही जणांची नाराजी होते मात्र समजावल्यानंतर सगळे समजतात, असेही फडणवीस यांनी आवर्जून स्पष्ट केले.
नगरच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी प्रचंड उत्साह दिसत आहे. रस्त्याने येताना गर्दी पाहून आज सगळ्या सभांचे गर्दीचे रेकॉर्ड तुटेल असे वाटते, असे आवर्जून फडणवीस यांनी सांगितले. आज राज्यात बारामतीसह विविध ठिकाणी मतदान सुरू असल्याने त्यावर ते म्हणाले, मतदानाची टक्केवारी समाधानकारक नाही.
वाढते तापमान हा त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण लोकशाहीत अभिव्यक्ती व्यक्त करण्यासाठी मतदान करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. दरम्यान, फडणवीस यांचे आगमन झाल्यावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर आशीर्वाद निवासस्थानी त्यांनी जिल्ह्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रा. राम शिंदे, माजी आ. शिवाजी कर्डिले, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, शिर्डीतील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे, आ. आशुतोष काळे, आ. मोनिका राजळे, अनुराधा व राजेंद्र नागवडे आदी उपस्थित होते. कोपरगावच्या कोल्हे परिवाराचे मात्र कोणी दिसले नाही.
त्यांचा इमोशनल अत्याचार
आ. रोहित पवार आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, महायुतीच्यावतीने आम्ही कुठल्याही चुकीच्या गोष्टी करत नाही. पण, मी बोलण्यापेक्षा जनताच आता बोलू लागली आहे. भावनिक करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र जनता समजदार आहे. निवडणुकांमध्ये कार्यकर्ते आमने-सामने येतच असतात. बारामतीमध्ये मोठी लढत आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी असे घडले असेल, पण त्यामुळे कोणीही अशा घटनांचा वापर करून इमोशनल अत्याचार करू नये, असा टोलाही त्यांनी रोहित पवारांना लगावला.