मुंबई – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आजही उच्च न्यायालयाचा दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली असून त्यावर उद्या (शनिवारी) दुपारी सुनावणी होणार आहे. यामुळे अर्णब गोस्वामी यांना आजची रात्रही कारागृहातच काढावी लागणार आहे.
वास्तुविशारद अन्वय नाईक यांनी साल 2018 मध्ये आत्महत्या केली होती. या आत्महत्येला जबाबदार असल्याच्या आरोपाखाली अर्णब गोस्वामी यांनी बुधवारी (4 नोव्हेंबर) रायगड पोलिसांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती.
त्यानंतर रात्री उशिरा त्यांना अलिबाग दंडाधिकारी न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याप्रकरणी पोलिसांनी आधीच आपला “ए’ समरी रिपोर्ट दाखल केला आहे. त्यामुळे पुन्हा आरोपीच्या पोलीस कस्टडीची गरज नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.