मुंबई – खासगी बसवाहतूक संपूर्ण क्षमतेने सुरु करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून देखील करण्यात येत होती. अखेर, राज्य सरकारने खासगी बस वाहतुकीलाही हिरवा कंदील दिला आहे.
राज्यात सर्व खासगी कंत्राटी बसमधून 100 टक्के प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परंतु खासगी बस वाहतूकीसाठी देखील सरकारने नियमावली जाहीर केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. बसमध्ये मास्क न घातलेल्या प्रवाशांना परवानगी नाही तसेच गाडीचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.
प्रवासाच्या अगोदर सर्व प्रवाशांचे तापमान मोजणे बंधनकारक आहे. ताप, सर्दी, खोकला असलेल्या प्रवाशांना प्रवासाची परवानगी नाही, या त्यातील महत्त्वाच्या अटी असणार आहे.
दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून खासगी बसवाहतूक पूर्णपणे बंद होती. मिशन बिगीन अंतर्गत सरकारने 50 टक्के प्रवासी क्षमतेने बस चालवण्याची परवानगी दिली होती.