नवी दिल्ली – पूर्व लडाखमध्ये घुसखोरीचे दुःसाहस केल्यावर भारतीय जवानांनी ठाम आणि प्रखरपणे केलेला विरोध आणि सीमेवर मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीला अप्रत्यक्ष परिणामांना सामोरे जावे लागत आहे, असे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हटले आहे.
पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवरील परिस्थिती तणावपूर्ण आहे आणि या संदिग्ध परिस्थितीला भारताला तोंड द्यावे लागते आहे. प्रत्यक्ष ताबा रेषा बदलायला लागणे भारत कधीही स्वीकारणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आभासी माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रामध्ये ते बोलत होते.
पाकिस्तान आणि चीनच्या संगनमतने प्रादेशिक सुरक्षिततेला अस्थैर्य आणि देशाच्या भौगोलिक एकात्मतेलाही सर्वव्यापी धोका निर्माण होतो आहे. सीमेवरील सर्वसमावेशक स्थिती, सीमेवरील संघर्ष, घुसखोरी आणि चिथावणीखोर लष्करी कारवायांचे रुपांतर व्यापक संघर्षात होणार नाही.
जम्मू काश्मीरमध्ये सुरू केलेले छुपे युद्ध आणि सोशल मिडीयावरील भारतविरोधी प्रक्षोभक प्रचारामुळे पाकिस्तानबरोबरचे संबंध आणखीनच खालावले आहेत. मात्र दहशतवादी कारवायांबाबत मर्यादा ओलांडल्यास त्याचे चोख प्रत्युत्तर दिले जाईल, हा संदेश सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकद्वारे पाकिस्तानला मिळाला आहे, असेही जनरल रावत म्हणाले.
भविष्यात नागरी-लष्करी सांघिक वृत्तीमुळे संपूर्ण देशातील राष्ट्रीय सुरक्षेकडे पाहण्याच्या दृष्टीकोन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, संज्ञानात्मक विज्ञान, रोबोटिक्स, ड्रोन, जैव शस्त्रे, निर्देशित उर्जा शस्त्रे, क्वांटम कंप्यूटिंग, नॅनो तंत्रज्ञान आणि सायबर क्षमता यांच्यात नवनिर्मिती करणाऱ्या हायपर कनेक्ट आणि सुपर सहयोगी जगाचा उदय आगामी काळात जगात बदल घडवून आणेल, असेही त्यांनी सांगितले.