पाटणा – बिहार मंत्रिमंडळाने राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत राज्यातील ९४ लाख गरीब कुटुंबांना उद्योजकता आणि स्वयंरोजगारासाठी प्रत्येकी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. जाती-आधारित सर्वेक्षण अहवालानुसार, बिहारमध्ये ९४ ३३ ३१२ कुटुंबे महिन्याला ६००० रुपये किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्नावर जगतात.
त्या गरीब कुटुंबाना राज्य सरकार आता प्रत्येकी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत करणार आहे.या पैशातून त्यांनी स्वयंरोजगार सुरू करून आर्थिक विकास साधावा अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे या दोन लाख रूपये मदतीची त्यांनी परतफेड करण्याची आवश्यकता नाही. उद्योग विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने मंजुरी दिल्यानंतरच कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाईल, असे ते म्हणाले.
या मदतीचा उपयोग लाभार्थी लघु-उद्योग/कुटीर उद्योगांमध्ये गुंतवणूक करू शकतात, ज्यात हस्तकला, कापड, सेवा क्षेत्र आणि इलेक्ट्रिकल वस्तूंचा समावेश आहे.ही रक्कम हप्त्यात दिली जाईल.
त्या खेरीज मंत्रिमंडळाने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्यांना मिळणाऱ्या भरपाईमध्येही वाढ केली आहे. मृत्यू झाल्यास आता एक लाख रूपयांऐवजी आता दोन लाख रूपये आणि कायमचे अपंगत्व आल्यास ७५ हजार रूपयांऐवजी एक लाख रूपये मदत दिली जाणार आहे.