मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेकरिता अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. याशिवाय येणाऱ्या काळात महामार्गावरील सुविधांची संख्या वाढविण्यात येणार आहे. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून समृद्धी महामार्गावरील वेगवेगळ्या अपघातांमध्ये आतापर्यंत शेकडो प्रवाशांना आपले प्राण गमावावे लागले आहेत.
हे अपघात नेमके कशामुळे होत आहे याची बरीच कारण आणि संशोधन करण्यात आले. अशात आता समृद्धी महामार्गावरील अपघातांचं नवं कारण समोर आलं आहे. या अपघाता बाबत अतिरिक्त पोलीस महासंचालक महामार्ग रवींद्र सिंगल यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी महामार्गावर झालेल्या अपघातांची सखोल माहिती दिली.
माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले, समृद्धी महामार्गावर ११ डिसेंबर २०२२ ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत वाहनांच्या पुढे अचानक प्राणी आल्यामुळे ८३ अपघात झाले. यामध्ये एकाचा मृत्यू तर २५ जण जखमी झाल्याची माहिती सिंगल यांनी दिली. त्याचबरोबर याच कालावधीत वाहनाच्या अतिवेगाने तसेच टायर फुटण्याच्या घटनांमध्ये समृद्धी महामार्गावर ७२९ अपघात झाले. त्यापैकी ३३८ अपघातात कुणीही जखमी नाही. तर ३९१ किरकोळ व गंभीर अपघातात १०१ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं सिंगल यांनी सांगितलं.
दरम्यान ते पुढे म्हणाले,’चुकीच्या पद्धतीने वाहन लावणे वा ब्रेकडाऊनमुळे येथे २२ अपघात झाले. त्यापैकी ६ मध्ये कुणीही जखमी नाही. १६ अपघातात २ मृत्यू तर २२ जण जखमी झाल्याची माहिती सिंगल यांनी दिली. अपघात नियंत्रणासाठी द्वारावर उद्घोषण, ट्रॅव्हल्सची तपासणी, पेट्रोलिंगसह इतरही प्रभावी उपाय सुरू केले असून त्यामुळे वीसहून जास्त दिवसापासून एकही प्राणांतिक अपघात झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.’