हैदराबाद/मुंबई : देशासमोर कोरोनाचे संकट घोंगावत असताना त्यात चिंता घालणारी बाब म्हणजे दिल्लीहून रामगुंडम रेल्वे स्थानका दरम्यान धावणाऱ्या संपर्क एक्सप्रेसमधून आठ कोरोना बाधितांनी प्रवास केल्याचे समोर आले आहे. तसेच मुंबईहून जबलपूरला जाणाऱ्या गोदान एक्सप्रेसमध्ये चार कोरोनाबाधितांनी प्रवास केल्याची बाब समोर आल्याने खळबळ उडालीआहे.
हे प्रवासी दिल्ली स्थानकांत चढले. ते रामगुंडम स्थानकांत उतरले. त्यामुळे कोरोनाचे भय लक्षात घेता अत्यावश्यक असेल तरच प्रवास करावा. महत्वाच्या कारणाशिवाय प्रवास टाळावा असे आवाहन रेल्वे मंत्रालयाने केले आहे. रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत रेल्वे हॅंडलरवर याची माहिती देण्यात आली आहे.
या प्रवाशांनी 13 मार्च रोजी या रेल्वेतून प्रवास केला होता. त्यांची काल चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, असे ट्विटरवर म्हटले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे.
गोदान मधून चार कोरोनाबाधित
मुंबईहून जबलपूरला जाणाऱ्या गोदान एक्सप्रेसमध्ये 15 मार्च रोजी प्रवास केलेल्या चार प्रवाशांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
गेल्या आठवड्यात दुबईतून हे प्रवासी आले होते. त्यांनी गोदान एक्सप्रेसमधून प्रवास केला होता. त्यांची कोरोना चाचणी 16 मार्च रोजी पॉझिटिव्ह आली असल्याचे आढळले आहे. त्यामुळे सर्व संबंधितांना सावधानतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत.