नवी दिल्ली : सहप्रवाशाला हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का दिसल्यानंतर त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर एका दाम्पत्याला दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमधून उतरवण्यात आले, अशी माहिती रेल्वेच्या वतीने शनिवारी देण्यात आली.
बेंगलोर दिल्ली राजधानी एक्सप्रेसमध्ये सिकंदराबाद स्थानकात हे दिल्लीस्थित दाम्पत्य चढले. तेलंगणातील काझीपेठ येथे जेव्हा सकाळी पावणे दहाच्या सुमारास रेल्वे पोहोचली तेंव्हा सहप्रवाशाशी हस्तांदोलन करताना त्यातील पुरूषाच्या हातावरील होम क्वारंटाईनचा शिक्का त्यांना दिसला. त्यांनी रेल्वेतील तिकीट तपासनिसाला याबाबत माहिती दिली.
त्यानंतर थोडा वेळ रेल्वे थांबवण्यात आली. या दाम्पत्याला ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवण्यात आले. काझीपेठ या बोगीचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात आले. त्यानंतर ही रेल्वे दिल्लीच्या दिशेने साडे अकराच्या सुमारास धावू लागली. दरम्यान या बोगॅतील वातानुकुलन यंत्रणा बंद करण्यात आली.
क्वारंटाईन होण्यास सांगितलेल्या लोकांचे पलायन हा देशभरात चिंतेचा विषय बनला आहे. अनेक ठिकाणी हे प्रकार घडत असल्याचे वृत्त येत आहे.