पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील कमाल तापमान वाढल्यामुळे उन्हाचा चटका असह्य झाला आहे, तर उकाड्याने पुणेकर हैराण झाले आहेत. आजही बहुतांश भागातील कमाल तापमान 40 अंशांच्या पुढे नोंदविण्यात आले. शहरासह जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी कमाल तापमान 40 पार असल्यामुळे आता मे महिन्याचा चटका जाणवत आहे.
मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे कमाल तापमानात लक्षणीय घट झाली होती. त्यामुळे दुपारी ऊन आणि रात्री गारवा असे वातावरण होते. मात्र, मागील तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असल्याने हवामान कोरडे आहे. परिणामी शहरातील कमाल तापमानात चार ते पाच अंशांनी वाढ झाली आहे.
सोमवारी (दि. 20) शहरात हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. तब्बल उष्णतेचा पारा 44 अंशापर्यंत पोहोचला होता. त्यामुळे काही भागात उष्णतेची लाट असल्याचा अनुभव आला. असह्य करणाऱ्या उन्हाच्या चटक्यामुळे काहींना त्रासही झाला.
दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस शहरासह जिल्ह्यातील हवामान कोरडे राहील. कमाल तापमानात वाढ होणार असून, उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे काही भागात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आल्याचे पुणे वेधशाळेने सांगितले.