काश्मीरचे माजी मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला ह्यांस अटक
दिल्ली, ता. 9 : काश्मीरचे माजी मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला आणि माजी महसूल मंत्री मिर्झा अली बेग ह्यांस अटक करण्यांत आली आहे. जम्मू आणि काश्मीर सरकारच्या हुकूमावरून श्रीनगर येथे ही अटक करण्यांत आली अशी श्रीनगरची बातमी आहे.
काश्मीरमधील ह्या ताज्या घडामोडीबाबत पंतप्रधान पंडित नेहरू हे उद्या (सोमवारी) भारतीय लोकसभेंत प्रश्नोत्तर-तासानंतर निवेदन करणार आहेत. काश्मीरमधील घडामोडींबाबतची माहिती भारत सरकारला देण्यांत येत असे ही गोष्ट खरी आहे परंतु एखादी गोष्ट घडल्यानंतर भारत सरकारला त्याबाबत माहिती कळविण्यात येत असे, असे भारत सरकारच्या एका प्रवक्त्यानें सांगितले. ह्या घडामोडींबाबत भारत सरकारबरोबर आगाऊ सल्लामसलत झाली नव्हती असें सरकारी गोटांतून समजते.
काश्मीरच्या भवितव्याबाबत जम्मू-काश्मीरमधील जनतेस भारत सरकारतर्फे जी आश्वासनें देण्यात आली आहेत त्यात ह्या नव्या घडामोडीमुळे बदल होण्याचे काही कारण नाहीं असेंही तो प्रवक्ता म्हणाला. तो पुढे म्हणला, “”जनतेचा पाठिंबा आणि विश्वास असलेल्या कोणत्याही सरकारला भारत सरकार पाठिंबाच देईल.”
हैदराबाद सिकंदराबादेंत 144 कलम
सिकंदराबाद, ता. 9 :हैदराबाद आणि सिकंदराबाद शहरांत आणि रेल्वे हद्दीत उद्यापासून 15 दिवसपर्यंत 144 कलम जारी करण्यांत आल्याचा हुकूम काढण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे दुसऱ्या एका हुकुमान्वयें हैदराबाद आणि सिकंदराबाद शहरांच्या हद्दीपासून 10 मैल भागांत उद्यापासून एक महिन्यापर्यंत 144 कलम जारी करण्यांत आले आहे.
ह्या हुकुमान्वयें बंदिस्त हद्दीत सभा-मिरवणुकीस बंदी करण्यांत आली असून पांच माणसांपेक्षा जास्त जमाव जमणें अगर घातक शस्त्रास्त्रें जवळ बाळगणे ह्यास बंदी करण्यांत आली आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या सरकारी बस वाहतुक संपाबाबत दक्षता घेणें हा ह्या बंदी हुकुमातील हेतु आहे.
काश्मीरचा दुसरा कोरिया होऊ नयें म्हणूनच हा निर्णय
श्रीनगर, एका साम्राज्यशाही वर्चस्वाखाली “स्वतंत्र काश्मीर’ची निर्मिती केल्याने जनतेच्या स्वातंत्र्यास धोका निर्माण झाला असता. अशा “स्वातंत्र्या’ने आम्ही आंतरराष्ट्रीय वावटळांत सांपडलो असतो आणि परस्पर-विरोधी राष्ट्र गटांच्या लष्करीं भांडणांतून दुसरा कोरिया निर्माण झाला असता असें जम्मू-काश्मीरचे नवे मुख्यमंत्री बक्षी गुलाम महंमद ह्यांनी जनतेस उद्देशून काश्मीरी रेडियो वरून केलेल्या भाषणांत सांगितले.