अरुण गोखले
काळ बदलला, परिस्थिती बदलली किंवा अगदी माणसाचे राहणीमान, जीवनमान बदललेले असले तरीसुद्धा त्याच्या मनातील ईश्वरावरची अतूट श्रद्धा, भक्ती यात फारसा बदल झालेला नाही. उलट सध्याच्या ताणतणावाच्या आणि अस्थैर्याच्या परिस्थितीत प्रत्येकालाच कोणाचा तरी एक आधाराचा हात हवा आहे. तो शाश्वत आधार त्या एका ईश्वरी शक्तीचाच असू शकतो आणि तो आपल्याला आपल्या श्रद्धा, भक्ती आणि उपासनेनेच मिळवावा लागतो.
मानवी मनातील श्रद्धा, भक्ती या गोष्टी वाढविण्याचे कार्य गेल्या अनेक पिढ्यांपासून आपल्याकडची ग्रंथ, पोथ्या, पुराणे करीत आहेत. त्याचे वाचन करून, चिंतन, मनन करून त्यानुसार आचरण करण्याची प्रेरणा मिळते.
पूूर्वीच्या काळी घरोघरी चालणाऱ्या या पोथी/ग्रंथ वाचनामागचा हेतू आहे की, आपण ज्या उपास्य देवतेची उपासना करतो, त्या देवतेचा अवतार, त्याचे अवतारकार्य, शिकवण, बोध, आदर्शाची माहिती व्हावी. कारण आपल्याकडे जे अनेक भक्तिसांप्रदाय आहेत, त्या प्रत्येकांनी आपापला एकेक ग्रंथ/पोथी ही निश्चित आणि स्वीकृत करून ठेवली आहे.
उदा. शिवोपासकाचे श्रीशिवलीलामृत, नाथ पंथियांची श्री नवनाथ भक्तिसार, दत्त सांप्रदायाचे श्रीमत् गुरूचरित्र, समर्थ सांप्रदायाचा दासबोध, भागवत सांप्रदायाची ज्ञानेश्वरी, गाथा किंवा एकनाथी भागवत इत्यादी.
अशा ग्रंथ किंवा पोथ्यांच्या वाचनाने त्याच्या पठण, उच्चाराने घरातील वातावरण हे शांत, शुद्ध आणि पवित्र होते. घरात सदाचार, सद्धर्म सत्प्रवृत्तीचा विकास होतो. तसेच मानवी जीवनातील काही समस्या दूर करण्यासाठी काही ग्रंथ, पोथ्या यांच्या विशिष्ट अध्यायांचे वाचन हे अत्यंत उपयुक्त ठरते. उदा. शिवलीलामृत ग्रंथाचा 11 वा अध्याय उपासकाला अकरा रुद्र केल्याचे पुण्य मिळवून देतो. श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाचा दुसरा अध्याय घराचे दुष्टशक्तीपासून रक्षण करतो. श्रीगुरूचरित्राचा 14 वा अध्याय हा संकट निवारण करणारा आहे, असे धर्मशास्त्र सांगते.
ज्ञानेश्वरी, भागवत यासारख्या ग्रंथांचे वाचन हे ईश्वरी साधना आणि आत्मविद्या प्राप्तीच्या साधनेस उपयुक्त ठरणारे आहे. समर्थांचा दासबोध माणसांनी जीवनात कसे वागावे, कसे वागू नये, आत्मकल्याण कसे साधावे याची शिकवण देणारा ग्रंथ आहे.