श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये विदेशातून गेल्या महिनाभरात सुमारे 60 अतिरेकी घुसले आहेत, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. त्याच वेळी स्थानिक नागरिक देशविघातक कृत्यात सहभागी होण्याचे प्रमाण सध्या आतापर्यंतच्या काळात सर्वात कमी असल्याचे त्यांनी सांगितले.
लष्करासह अन्य यंत्रणा डोळ्यात तेल घालून तपासणी पाहरा देत असतानाही हे अतिरेकी काश्मिरात घुसले आहेत. त्यांचा श्रीनगर आणि अन्य भागातील वावर तपास यंत्रणांनी टीपला आहे. श्रीनगरमध्ये स्थानिक नागरिकांना घाबरवण्यासाठी हवेत गोळीबार करण्याच्या घटना घडल्या आहेत, असे या सुत्रांनी सांगितले.
येथील दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा बंद असल्याने हे अतिरेकी आपल्या हॅंडलरशी संभाषण करण्यासाठी पंजाबमध्ये जात आहेत. असे काही कॉल तपास यंत्रणांनी इंटरसेप्ट केले आहेत. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आली आहे. पाकिस्तान या भागात अधिकाधिक अतिरेकी घुसवण्याच्या तयारीत आहेत. भारतात घुसलेले अतिरेकी वेगवेगळे गट करून रहात आहे. खाण्यासाठी ते थांबलेल्या ठिकाणच्या ग्रामस्थांनी याला पुष्टी दिली आहेत, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.