नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीच्या विरोधात स्थापन झालेल्या इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दोनच दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत गर्जना केली होती. मात्र आता काही तासांच्या आतच जम्मू काश्मीरमधील पीपल्स डेमोक्रॅटीक पक्षाच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी वेगळा मार्ग पत्करला आहे. काश्मीरमधील तीन जागांवर स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे या राज्यात इंडिया आघाडी संपुष्टात आल्याचे बोलले जाते आहे.
काश्मीरमधील तीन जागा स्वतंत्रपणे लढण्याखेरीज अन्य कोणताही पर्याय आमच्याकडे नव्हता. आता संसदीय पक्ष उमेदवारांच्या संदर्भात येत्या काही दिवसांत अंतिम निर्णय घेईल असे नमूद करून त्या म्हणाल्या की केंद्र सरकारने २०१९ मध्ये जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केल्यानंतर सगळ्या पक्षांनी एकत्र राहणे ही काळाची गरज आहे.
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला आमचे वरिष्ठ नेते आहेत असे मुंबईत झालेल्या आघाडीच्या बैठकीतही मी सांगितले होते. जागावाटपाबाबत ते योग्य निर्णय घेतील आणि न्याय करतील असे मी म्हणाले होते. तसेच पक्षाचे हित बाजूला ठेवत त्यांनी भूमिका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती.मात्र नॅशनल कॉन्फरन्सने सर्व तीन जागांवर निवडणूक लढवण्याचा एकतर्फी निर्णय घेतला.
त्या पुढे म्हणाल्या की उमर अब्दुल्ला ज्या पध्दतीने बोलले ते फार अपमानजनक होते. तो केवळ माझा नाही तर माझ्या कार्यकर्त्यांचाही अपमान होता. अशा स्थितीत तुम्ही नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा द्या असे मी कार्यकर्त्यांना कसे सांगू शकते? आता आम्हीही उमेदवार उभे करणार आणि निर्णय जनतेवर सोपवणार. त्यांना संसदेत कोणाचा आवाज हवा आहे यावर आता मतदारच निर्णय घेतील.
दरम्यान, पीडिपीने सर्व पाच जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला असेल तर ती त्यांची आवड आहे. त्यांच्या फॉर्म्युल्याच्या आधारावरच आम्ही काश्मीरमधे तीन उमेदवार रिंगणात उतरवले होते अशी प्रतिक्रिया उमर अब्दुल्ला यांनी दिली आहे.