ग्रामस्थांनी केली उपाययोजना करण्याची मागणी
पारगाव शिंगवे – मागील काही दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या बदलामुळे आंबेगाव तालुक्यातील पारगाव परिसरात थंडी, ताप व डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने ताडणीने उपाययोजना करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
तालुक्यात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी चिखल मातीची डबकी तयार झाली आहेत. तसेच गवतही मोठ्या प्रमाणात उगवलेले असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या डबक्यांमध्ये डेंग्यूची अंडी मोठ्या प्रमाणात तयार होत असल्यामुळे परिसरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. डासांमुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत.
थंडीताप, खोकला, सर्दी या आजाराचे रुग्ण प्रत्येक घरात दिसून येत आहेत.
पारगावमध्ये डेंग्यूचे रुग्ण सर्वात जास्त आढळून आले आहेत. परिसरातील दवाखाने रुग्णांनी हाउसफुल झाली आहेत. ग्रामस्थांनी आपल्या घरासमोरील परिसरात पाणी साचून न देता परिसर स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने औषधांची फवारणी केली असूनही डासांची पैदास वाढत आहे. आरोग्य खात्याने ताडणीने उपाययोजना न केल्यास युवा सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पारगावचे युवासेना अध्यक्ष अनिल शेवाळे यांनी दिला आहे.
- ग्रामपंचायतीच्या वतीने डासांची पैदास होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. धुराळणी व गवताची तणनाशक फवारणी करण्यात येत असून ग्रामस्थांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
बबनराव ढोबळे, सरपंच - गावातील घरोघरी जाऊन सर्वे करण्यात आला असून थंडी तापाचे रुग्ण आढळून आलेले आहेत. तसेच घरातील पाणी तपासणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांना आरोग्यविषयी माहिती देण्यात आली आहे.
बी. के. पांचाळ, आरोग्यसेवक पारगाव आरोग्य उपकेंद्र