मुंबई – पाकचे पंतप्रधान भुट्टो यांनी काश्मीर कराराचे निषेधार्थ आज हरताळाचा आदेश दिला होता परंतु काश्मिरी लोकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यांचे नित्याचे व्यवहार सुरू होते. या हरताळ प्रकरणी श्रीनगरच्या नौहाटा भागात शेखसाहेब व अवामी कृति समितीचे कार्यकर्ते यांचे दरम्यान चकमकी उडाल्या. त्यावेळी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा करून दंगल थांबविली.
भुट्टोंना अब्दुल्लांचा टोला
या हरताळाबाबत मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला म्हणाले, असे हजारो हरताळ भुट्टोंनी पुकारले तरी काश्मीरचे भवितव्य ठरविण्याचा हक्क त्यांना कधीही मिळणार नाही. काश्मीर आमचे आहे. त्याचे भले कसे करायचे ते आम्ही चांगले जाणतो. पाकिस्तानात मात्र काश्मीर प्रकरणी संपूर्ण हरताळ पाळण्यात आला. बंदरे, रेल्वे स्टेशन्स व विमानतळ येथे शुकशुकाट होता.
केंद्रीय अंदाजपत्रक सामान्य माणसावर प्रचंड बोजा
नवी दिल्ली – अर्थमंत्री सुब्रमण्यम यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात चहा, साखर, सिगारेट, तंबाखू, सिमेंट, कृत्रिम धागा, पेट्रोल, सौंदर्यप्रसाधने, अंगाला लावण्याचा साबण, कापड या सामान्य लोकांना लागणाऱ्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात करवाढ केल्याने महागाईने त्रासलेला मध्यमवर्गीय आणखीनच भरडून निघणार आहे. बहुतेक वाढलेले कर अप्रत्यक्ष स्वरूपाचे असल्याने त्यांचा बोजा गिऱ्हाईकावरच पडणार आहे.
कारखाने, छापखाने, दुकाने व हॉटेल्स यांना वीजकपातीत सवलत
मुंबई – मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी विधानसभेत असे जाहीर केले की, वीजकपातीच्या धोरणात कारखाने, छापखाने, दुकाने, हॉटेल्स व रेस्टॉरंट यांना थोडी सवलत देण्यात येईल. वीजकपातीच्या चालू धोरणामुळे उत्पादन व नोकऱ्या यावर अनिष्ट परिणाम झाला आहे.