मराठी साहित्याचा मानदंड म्हणजेच कुसुमाग्रज. त्यांनी मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा झाला. त्यानिमित्त त्यांच्या कवीमनाचा आस्वाद घेऊया…
विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज, मराठी साहित्यविश्वातील एक तेजोमय तारा. त्यांनी दे. ना. टिळक यांच्या बाळबोध मेवा मध्ये लेखनास सुरुवात केली. त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनाचा प्रवास 1933 मध्ये नवा मनू मधून प्रारंभ झाला. 1934 मध्ये मराठी व इंग्रजी विषय घेऊन ते बी. ए. झाले. 1936 ते 1938 या कालखंडात त्यांनी गोदावरी सिनेटोनमध्ये प्रवेश केला आणि मराठी चित्रपटांसाठी पटकथा लिहिणे सुरू केले. धार्मिक चित्रपट सती सुलोचना याची पटकथा लिहिली आणि त्यामध्ये अभिनेता म्हणूनही काम केले. 1938 ते 1946 हा काळ त्यांच्या वृत्तपत्रांच्या कारकिर्दीचा ठरला. या अवधीत त्यांनी दैनिक प्रभात, सारथी, धनुर्धारी, नवयुग या वृत्तपत्रातून विपुल लेखन केले. 1946 ते 1948 या काळात त्यांनी साप्ताहिक स्वदेशचे संपादनही केले.
अवघ्या वीस वर्षांच्या वयात त्यांनी आपला पहिला मराठी कवितासंग्रह “जीवनलहरी’ प्रकाशित केला. पहिल्या आवृत्तीत फक्त 60 जीवनलहरींचा समावेश होता, तर 1949 मध्ये प्रकाशित आवृत्तीत 143 जीवनलहरींचा समावेश झाला. या कवितांचे स्वरूप स्फुट आहे, अष्टचरणी बारा मात्रांचा एक चरण व तीन ते चार शब्दांची एक ओळ असे आहे. पहिल्या चार ओळीत काही वेळा एक विचार येतो व पुढील चार ओळीत कलाटणी साधली जाते. याच कविता संग्रहातून त्यांच्या कवी व्यक्तित्वाची सारी बीजे अनुस्यूत झाली आहेत. कुसुमाग्रजांची सारी प्रतिभा प्रत्यक्षनिष्ठ आणि वास्तवाधिष्ठित आहे. ती वास्तवातील भावनाशयाचे, विचारशयाचे प्रतिबिंब आपल्या शब्दमखरातून अभिव्यक्त करते.
कुसुमाग्रजांचे अनुभव बहुकेंद्री आहेत. बोरकर, कांत, अनिल, माधव ज्युलियन, कविवर्य बी, ना. घ. देशपांडे या समकालीन कवींची कविता मूलतः आत्मोद्गारी आणि आत्मकेंद्रित होती. त्याच काळात ध्रुव मंडळाच्या या कवीने सुटे विचार, सुट्या भावना आणि कल्पना अभिव्यक्त करण्यास सुरुवात केली. ज्या काळात खंड काव्याची प्रथा होती त्यावेळी काही ओळींच्या कविता लिहून कुसुमाग्रजांनी रसिकांना बुचकळ्यात पाडले. कुसुमाग्रजांच्या काव्यात संस्कृत प्रतिकांचे विशेष प्राबल्य आढळते.
स्फटिकांचे मंदिर, कुंजांची जाळी, अमर वसाहत, चंद्रमुखी, मधुराणी, मधुगंध, कुसुम, गीतसुधा, एकांत ही सहज लक्षात येणारी प्रतीके आहेत. त्यांच्या कवितेत जसा मानवतेवरील निष्ठेचा, स्वातंत्र्य, समता या मूल्यांचा अंकुर दिसतो तसेच प्रणयाचे दुहेरी रूपही व्यक्त होते. 1936 साली प्रकाशित “विशाखा’मधून त्यांच्या व्यक्तित्वाचे सारे पैलू प्रकर्षाने प्रकट होतात. स्वातंत्र्याची दुर्दम्य ओढ, क्रांतीचा आवेश, भविष्यावर निस्सीम श्रद्धा, मानवतावादाची उत्कटता हे सारे अप्रतिम पणे शब्दमय होते. विशाखेतील कविता विलक्षण रसिकमान्य आणि लोकमान्य ठरली. “क्रांतीचा जयजयकार’ ही कविता तर प्रत्येक देशबांधवांच्या मनोगत आहे.
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार
अन वज्राचे छातीवरती घ्या झेलून प्रहार
जालियनवाला बाग हीसुद्धा संबोधनात्मक असून कवी त्यातून जाब विचारतो. बळी, गुलाम, लिलाव, बंदी, प्रतीक्षा यातून सामाजिक जाणीव प्रतीत होते. ग्रीष्माची चाहूल, नदीकिनारी, मेघास, भावकणिका आणि वनराणी या कवितांमधून कविमन निसर्गाशी एकरूप होते. अतिशय कोमल, नाजूक, भावपूर्ण, थरथरता असा उत्कट प्रणयाचा अनुभव तरल शब्द कळेसह प्रेम कवितेतून गोचर होतो. सखी सहवासातील धुंद रात्रीचा शेवट, हिरमुसलेली प्रिया, तिची समजावणी या तरल भावनांच्या पाकळ्या नाजूक शब्दकळेने उमलून येतात.
नकोस पसरू मादक बाहू,
मृदुल बंध हे कुठवर साहू
नभनाविक मी कुठवर राहू,
या आकुंचित जगी गुदमरूनि
करी मुक्त विहंगम हा रमणी
समिधाच सख्या ह्या कवितेची जातच वेगळी आहे-
समिधाच सख्या ह्या, त्यात कसा ओलावा
कोठून फुलापरी वा मकरंद मिळावा?
जात्यास रूक्ष ह्या, एकाच त्या आकांक्षा
तव आंतरअग्नी क्षणभर तरी फुलवावा
नाट्यानुभवातील काव्यात्मता आणि गद्य काव्यातील नाट्यपरता यांचा कवीजनिवेशीचा संबंध समिधा या 1947 साली प्रकाशित काव्य संग्रहात होतो. कथात्मक, रूपकात्मक आणि प्रतीकात्मक कवितांवर वि. स. खांडेकरांच्या रूपककथांचा प्रभाव दिसतो. भव्यता, उत्तुंगता आणि कल्पकतेची तरलता हेच कुसुमाग्रजांच्या आकाशगामी प्रतिभेचे मूलधर्म आहेत. त्यांच्या चिंतनाचे विषयही तेच आहेत, मानवी जीवनातील गुंतागुंत, माणसाची अनिकेत अवस्था, ईश्वराचे अस्तित्व, स्वातंत्र्याकांक्षा इत्यादी.
1952 च्या किनारा मधून त्यांच्या कवितांचा विकास आणि विस्तार दिसतो. महाकवी कालिदासाच्या मेघदूत या भावकाव्याचे रूपांतरही त्यांनी केले. मराठी मातीमध्ये प्रेम कवितांना विशेष स्थान मिळालेले दिसते. प्रणयाची अनेक अवस्थांतर यात पाहायला मिळतात. एकीकडे स्वप्नभेटीतील निर्भर तृप्ती आहे तर दुसरीकडे वास्तवातील संकोची अतृप्ती आहे.
प्रणयभूती व्यक्त करताना तृप्ती-अतृप्तीचा धागा संपूर्ण प्रणय काव्यात गुंफला गेलेला आहे. आत्मलक्षी होण्याच्या प्रयत्नात कुसुमाग्रजांना किनारापासून यश येत गेले. अनुभवाच्या आविष्कारात नवनवी परिवर्तने घडवून नावीन्य आणि ताजेपणा कसा राहील याचे पुरेपूर भान त्यांनी राखले आहे. 1987 मध्ये कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकाला 1974 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला.
प्रा. डॉ. गणेश मा. काकांडीकर