लालगंज – देशाची प्रगती झाली नाही, हा विरोधकांचा आरोप पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी धुडकावून लावला. त्या म्हणाल्या, सर्व क्षेत्रात चांगला विकास झाला आहे आणि लोकांना तो ठाऊक आहे. अवर्षण, महापूर व बांगला देश आदी प्रश्न वगळता अन्य वेळी देशाची आर्थिक प्रगती झाली. गेल्या दोन वर्षातील प्रगती तर विशेष उल्लेखनीय आहे. त्या म्हणाल्या, जनता पक्षा जवळ कार्यक्रम नाही. कॉंग्रेसला विरोध करणे हेच त्यांचे ध्येय आहे.
देशातील वातावरण चांगले
कलकत्ता – स्वतंत्र आणि योग्य वातावरणात निवडणुका होतील, अशी परिस्थिती असल्याचे आपल्याला आढळून आले आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्त टी. स्वामीनाथन यांनी सांगितले. स्वामीनाथन ओरिसाच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी येथे थांबले होते. ते म्हणाले, निवडणूक प्रचार जोरात चालला असून सर्वत्र शांतता आहे. मोरारजी देसाई व जगजीवनराम यांनी निवडणुका स्वतंत्र व निर्भय वातावरणात होतील अशी आशा व्यक्त केल्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त टी. स्वामीनाथन यांनी त्यांचे आभार मानले.