नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने सगळेच राजकीय पक्ष आपापली रणनीती तयार करण्यात व्यस्त झाले आहेत. विरोधकांच्या इंडिया आघाडीच्याही बैठका सुरू झाल्या असून त्याद्वारे आपली ताकद दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. अनेक मुद्द्यांवर आघाडीतील घटक पक्षांमध्ये मतभेद आहेत. मात्र ते अजून फार गंभीरपणे समोर आले नाहीत. तथापि, लोकसभा निवडणुकीपर्यंत आघाडी टिकणार की नाही अशी शंकाही अनेकांच्या मनात असून या निवडणुकीच्या संदर्भातील पहिली जनमत चाचणी याच विषयावर घेण्यात आली असून त्यात आघाडी टिकेल अशी भावना ३७ टक्के लोकांनी व्यक्त केली आहे.
एबीपी न्यूजने याबाबत १३ हजार ११५ नागरिकांशी संवाद साधून त्यांचे मत जाणून घेतले. १५ डिसेंबर ते २१ डिसेंबर या काळात हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात प्लस किंवा मायनस तीन ते पाच टक्के त्रुटी असू शकते असेही सांगण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत इंडिया आघाडीत एकजुट राहणार का हा प्रश्न नागरिकांना विचारण्यात आला होता. त्याला ३७ टक्के लोकांनी होकारार्थी उत्तर दिले आहे. मात्र ५० टक्के लोकांनी आघाडी राहणार नाही असे उत्तर दिले आहे. तर १३ टक्के लोकांनी काही माहिती नाही असे मत नोंदवले आहे.
या सर्वेक्षणाच्या आधारे आता असाही दावा केला जातो आहे की देशातील लोकांना अद्याप इंडिया आघाडीवर विश्वास नाही. कारण आघाडी टिकणार नाही म्हणणाऱ्यांची संख्या तब्बल ५० टक्के आहे. त्यामुळे लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे मोठे काम आघाडीतील नेत्यांना करावे लागणार असून विसंगत मते प्रदर्शित करणे टाळत संयुक्त सभा घेऊन लोकांना तो विश्वास द्यावा लागणार आहे. तसेच एक चेहरा पुढे करून पर्यायी कार्यक्रमही त्यांना जनतेसमोर मांडावा लागणार आहे.
आघाडीच्या दृष्टीने महत्वाची बातमी अशी की आघाडीचा चेहरा कोण असावा या प्रश्नाला मात्र ३४ टक्के लोकांनी राहुल गांधी यांच्या नावावर मोहोर उमटवली आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेले अरविंद केजरीवाल १३ टक्के लोकांच्या पसंतीसह बरेच मागे आहेत. तर इतर अनेक नेत्यांना दोन आकडी संख्याही गाठता आलेली नाही.