पाटणा -केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीराज सिंह यांनी शनिवारी सनसनाटी दावा केला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष (जेडीयू) लवकरच राजदमध्ये विलीन होणार असल्याचे त्यांनी म्हटले. दिल्लीत नुकतीच इंडिया या विरोधी पक्षांच्या देशव्यापी आघाडीची बैठक झाली.
त्यामध्ये नितीश यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जानेवारीपर्यंत जागावाटप निश्चित करण्याचा प्रस्ताव मांडला. त्याविषयीचा प्रश्न पत्रकारांनी सिंह यांना विचारला. त्यावर ते उत्तरले, राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्याशी माझे वैयक्तिक संबंध आहेत. ते माझ्याशी बऱ्याच विषयांवर बोलले. त्याबाबत मी जाहीर भाष्य करू शकत नाही.
मात्र, जेडीयूचे लवकरच राजदमध्ये विलिनीकरण होणार असल्याचे मी सांगू इच्छितो. त्यामुळे त्यांच्यातील जागावाटपाचा विषयच उपस्थित होणार नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
सिंह यांच्या दाव्याला महत्व येण्याचे कारण म्हणजे ते नुकतेच लालूंसमवेत एका विमानातून दिल्लीहून पाटण्यात दाखल झाले. लालू इंडियाच्या बैठकीसाठी, तर सिंह संसद अधिवेशनासाठी दिल्लीला गेले होते.
सिंह यांनी गुरूवारी सायंकाळी दिल्लीहून पाटण्यात दाखल झाल्यानंतरही पत्रकारांशी बोलताना भुवया उंचावणारे वक्तव्य केले होते. आता बिहारचे उपमुख्यमंत्रिपद सांभाळणाऱ्या मुलाला (तेजस्वी यादव) मुख्यमंत्री बनवण्याची वेळ आली असल्याची भावना लालूंनी व्यक्त केल्याचे त्यांनी म्हटले होते.
दिल्लीत २९ डिसेंबरला जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय परिषदेच्या बैठका होणार आहेत. त्यामध्ये महत्वाचे निर्णय होण्याच्या चर्चांनी आधीपासूनच जोर धरला आहे. अशात सिंह यांनी केलेल्या दाव्यांमुळे तर्क-वितर्कांना उधाण येण्यासाठी आणखी खतपाणी मिळाले आहे.