पंढरपूर – येथील हभप रंगनाथ महाराज जनार्धन (अण्णा) उखळीकर मठात उखळीकर फडाचे मुळपुरूष श्री संत केदारी महाराज यांच्या जन्म त्रिशताब्दी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे (दि. 9 ते 16 मे) आयोजन करण्यात आले होते. यावेळी सप्ताहात 300 भाविकांनी संत तुकाराम महाराज गाथाचे पारायण केले.
सप्ताहात दैनंदिन काकडा भजन, गाथा पारायण, संत केदारी महाराज जीवन चरित्र कथा, हरिपाठ, हरिकीर्तन, हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हभप प्रभाकर महाराज झोलकर, आदिनाथ महाराज लाड, ज्ञानेश्वर महाराज कदम, उमेश महाराज दशरथे, राम महाराज झिंजुर्के, महादेव महाराज राऊत, विष्णू महाराज उखळीकर, जयवंत महाराज बोधले यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. हभप प्रभाकर महाराज झोलकर यांनी संत केदारी महाराज चरित्र कथा कथन करून उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले होते. तसेच टाळ, मृदंगाच्या जयघोषात राजेंद्र महाराज काटे आखेगाव यांच्या नेतृत्वाखाली भजन पद्धतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज गाथा पारायण संपन्न झाले. बापूसाहेब महाराज उखळीकर यांचे काल्याचे कीर्तनाने हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. तत्पूर्वी सकाळी आठ वाजता (दि. 16 मे) उखळीकर मठातून ग्रंथ दिंडीचे प्रस्थान झाले. पंढरपूर नगरीला प्रदक्षिणा करून दिंडी विठ्ठल मंदिरात पोहोचली. सभामंडपात अभंग आरती होऊन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून मानाचा प्रसाद घेऊन दिंडी मठात आली.
सप्ताहात प्रामुख्याने परभणी, बीड, उस्मानाबाद, पंढरपूर परिसरासह राज्यातील विविध भागातील 700हून अधिक भाविक उपस्थित राहिले. सात दिवस भाविक हरिनाम गजरात न्हाऊन निघाले होते. हभप बालासाहेब महाराज, बापूसाहेब महाराज, रामेश्वर महाराज उखळीकर यांनी सप्ताहाचे आयोजन केले होते.