सोलापूर – वारकरी संप्रदायातील चार मोठ्या यात्रांपैकी एक असणारी चैत्री यात्रा 15 ते 21 एप्रिल दरम्यान होणार असून भाविकांना या यात्राकाळात पहाटे पाच वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत विठुरायाचे मुखदर्शन घेता येणार आहे. गुरुवारी चैत्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी प्रशासनाची बैठक घेऊन याबाबत सूचना दिल्या.
सध्या विठ्ठल मंदिरात संवर्धनाचे काम सुरु असल्याने विठुराया काचपेटीत असून देवाच्या पायावरील दर्शन पूर्ण बंद आहे. पहाटे पाच ते सकाळी १० वाजेपर्यंत विठुरायाचे केवळ मुखदर्शन भाविकांना घेता येत आहे.
मात्र चैत्री यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने भाविक येत असल्याने संपूर्ण यात्रा कालावधीमध्ये रात्री १२ वाजेपर्यंत विठुरायाचे मुखदर्शन सुरु ठेवण्यात येणार आहे. यासाठी गोपाळपूर येथे 8 पत्र्याचे शेड उभारण्याचे काम सुरु असून उन्हाळ्याची परिस्थिती असल्याने संपूर्ण दर्शन रांगेत पंखे, कुलर आणि थंड पाणी देण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या आहेत.
चैत्री शुध्द एकादशी ही १९ एप्रिल रोजी आहे. यादिवशी भाविकांची सर्वात जास्त संख्या असणार आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना उष्णतेचा त्रास होवू नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व औषधोपचारासाठी आवश्यक असलेली सर्व सामुग्री उपलब्ध ठेवावी, अशा सूचनाही करण्यात आलेल्या आहेत.