मंचर (प्रतिनिधी) – राजस्थानमधील माऊंट आबू येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील सुमारे 2500 साधकांना महाराष्ट्रात अणण्यास दोन्ही राज्यांकडून परवानगी मिळाली आहे. यात पुणे जिल्ह्यातील 400 साधकांचा समावेश आहे. पुढील काही दिवसात या साधकांना आपपल्या घरी आणण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
मंत्री वळसे-पाटील म्हणाले की, गेल्या महिन्यात माऊंट आबूला सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून सुमारे 2500 साधक गेले होते. सोहळा संपला. मात्र, दरम्यानच्या काळात लॉकडाऊन वाढल्याने सर्व साधक तेथेच अडकले. यामधील सुमारे 250 ते 300 साधक आंबेगाव, खेड आणि जुन्नर या भागातील आहेत. या साधकांनी केलेल्या विनंतीनुसार आश्रमाच्या प्रमुखांनी माझ्याशी संपर्क साधला.
राज्यस्थान सरकारच्या संबंधित विभागाच्या आधिकाऱ्यांशी देखील मी स्वत: बोललो. त्यानंतर राज्यसरकारचा आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच राजस्थान सरकारच्या गृह विभागाचे अतिरिक्त सचिवांशी सातत्याने झालेल्या संपर्कातून राजस्थान सरकार या साधकांना राज्यात पोहोचविण्यात तयार झाले. या साधकांमध्ये 90 टक्के महिला साधकांचा समावेश आहे.
या साधकांना राजस्थानमधून मध्यप्रदेश व गुजरातमार्गे महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे. या दोन्ही राज्यातून प्रवास करता यावा, यासाठी परवानगीची प्रक्रियादेखील पूर्ण करण्यात येत आहे. सर्व साधक राज्यात आपापल्या गावी गेले तरी त्यांना 14 दिवस घरी वेगळे राहावे लागणार आहे.